मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाय.बी.सेंटर येथे “लोक माझे सांगाती’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला. शरद पवार यांच्या या निर्णयाला कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला. सभागृहात उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांना तर अक्षरशः अश्रु अनावर झाले.
यावर आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया देत शरद पवारांचा राजीनाम्याचा निर्णय मास्टर स्ट्रोक असल्याचं म्हटल आहे. राजू पाटील म्हणाले,’शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. एक व्यक्ती, एक माणूस म्हणून बोलायचं झालं तर त्यांचं वय व आजार याचा विचार करून हा निर्णय घेतला असावा. राज ठाकरे मागे मुलाखतीत म्हणाले होते की, शरद पवार कामात वाघ आहेत. मात्र, कुठेतरी थांबायला हवं आणि म्हणून ते थांबले असावेत.” असेही ते म्हणाले आहे.