Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत सुप्त संघर्ष सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चा होण्यामागे तशा घडामोडी देखील गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांची नाव वगळल्याने मोठी चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महत्वाचे विधान करत दोन्ही नेत्यांचे कौतुक केले आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे दोन्ही क्षमता असणारे नेते आहेत, त्यांच्या क्षमतेचा कसा वापर करावा, हे त्यांच्या आत्ताच्या नेतृत्वाकडे अधिकार आहे, असं म्हणत शरद पवार म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल आमच्या सोबत नाहीत. मात्र ते गेले 25 वर्षे माझ्यासोबत होते. सुनील तटकरे जिल्ह्यात नेते आणि राज्याचे अर्थमंत्री होते. त्यांच्यामधे काय कर्तुत्व आहे याची मला कल्पना आहे. 2029 मध्ये बारामतीत “पवार विरुद्ध पवार” असा संघर्ष होण्याच्या चर्चांवर बोलताना प्रत्येकाने संयम आणि काळजी घेण्याचा सल्ला शरद पवारांनी दिला. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्स अकाउंटवरून कार्यकारिणीतील गोंधळाला “टायपिंग मिस्टेक” कारणीभूत असल्याचं सांगितलं होतं. मात्र, त्यात सुधारणा न करण्यात आल्याने तटकरे आणि पटेल या नेत्यांना पक्षात डावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचदरम्यान, सुनील तटकरे यांनी शरद पवारांची घेतलेली भेटही चर्चेचा विषय ठरली. ही राजकीय भेट नव्हती तर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली असल्याचे स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्याबाबत प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे नाराज असल्याचं बोललं जात आहे. गुवाहाटीहून परतताना या दोघांनी सुनेत्रा पवारांसोबत प्रवास न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईपर्यंत विमानप्रवास केल्याने पक्षातील अंतर्गत मतभेद अधिकच चर्चेत आले आहेत. आमदार रोहित पवार यांनीही मोठा दावा करत “सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे 22 आमदारांसह भाजपमधून निवडणूक लढवू शकतात,” असं म्हटलं आहे. तसेच आमदार सुनील शेळके हेही भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे पडद्याआड मोठं राजकारण शिजतयं का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. हेही वाचा : Ranbir Kapoor: अयोध्येत रणबीर कपूरची मोठी गुंतवणूक; म्हणाला… “अयोध्येनेच मला निवडलं!”