‘त्या’ पोस्टवर शरद पवारांना राग अनावर; फेसबुकवरून खुलासा

मुंबई – जुलैचा दुसरा पंधरवडा उजाडला, तरी राज्यात अद्याप निम्या क्षेत्रावर पेरण्या झालेल्या नाहीत. मराठवाडा आणि विदर्भात पावसाने मोठी ओढ दिल्याने पेरणी क्षेत्र घटले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अशातच राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून त्यांच्या मोबाईलचा रिचार्ज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातर्फे करण्यात येणार असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. याबाबत शरद पवार यांनी संताप व्यक्त केला असून स्वतः फेसबुकवरून खुलासा केला आहे.
शरद पवार यांनी म्हंटले कि, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून त्यांचा मोबाइल माझ्यातर्फे मोफत रिचार्ज करून दिला जाईल, अशी अफवा व्हॉट्सअॅप सोशल माध्यमावरून पसरत असल्याचे मला समजले. काही समाजकंटकांनी पीडित शेतकऱ्यांची केलेली ही क्रूर चेष्टा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करून मी असे कृत्य करणाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त करतो, असे त्यांनी लिहले आहे. तसेच सायबर यंत्रणेने या पोस्टची दाखल घेऊन तात्काळ तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही केली आहे.





