सांगोला नगरपालिका निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट)ला मोठे यश मिळाले आहे. या विजयानंतर शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी एक वादग्रस्त आणि अजब दावा करून सर्वांचे लक्ष वेधले. “ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाचे बटन दाबले, ते स्वर्गात जाणार,” असा थेट दावा शहाजीबापू पाटील यांनी केला. या विधानानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याच कार्यक्रमात शहाजीबापू पाटील यांनी माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावरही तुफान टोलेबाजी केली. दीपक साळुंखे यांना “पांढऱ्या पायाचे” संबोधित करत त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्देवर कडक टीका केली. शहाजीबापू म्हणाले, “दीपक साळुंखे म्हणतात मी किंग मेकर आहे, मी जिकडे जातो तिकडे विजय मिळतो. पण ते पांढऱ्या पायाचे आहेत. ते गणपत आबांकडे गेले, तेव्हा पराभव झाला; विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे गेले, तेव्हाही पराभव; लोकसभेला संजय शिंदेंकडे गेले, पराभव; पुन्हा निंबाळकरांकडे गेले, पराभव; आता भाजपकडे गेले आणि भाजपचाही पराभव झाला.” या शब्दांत त्यांनी साळुंखे यांच्या राजकीय प्रवासावर जोरदार हल्लाबोल केला. पुढे बोलताना शहाजीबापू पाटील यांनी स्वतःच्या राजकीय संघर्षाचा उल्लेख करत साळुंखे यांच्यावर आणखी टीका केली. ते म्हणाले, “चाळीस वर्षे मी एकट्याने लढत होतो. माझी एकट्याची लढत होती. गणपतराव देशमुख यांच्यासोबतही लढाई केली. हत्तीबरोबर लढाई करणारा मी माणूस आहे. आणि हे माझे पाय ओढत आहेत. मी शून्य नाही. अजून भाजपात प्रवेशही झालेला नाही, तरी इतकी मस्ती कशी आली? पालकमंत्री कार्यालयात येऊन चहा पिऊन गेले, तरी इतकी मस्ती?” शहाजीबापू पाटील यांच्या या आक्रमक भाषणामुळे सांगोला आणि परिसरातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या “धनुष्यबाण दाबणारे स्वर्गात जाणार” या दाव्याने धार्मिक आणि राजकीय चर्चेला उधाण आले आहे, तर दीपक साळुंखे यांच्यावरील टीकेने थेट वैयक्तिक पातळीवर हल्ला झाला आहे. आता माजी आमदार दीपक साळुंखे या टीकेला काय उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.