मुंबई – राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या शिवसेनेच्या निर्णयाबद्दल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. शिवसेनेची भूमिका अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि राज्यघटना रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. महिला, पुरूष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही. जे लोकशाही आणि राज्यघटना रक्षणाच्या बाजूने आहेत; ते यशवंत सिन्हा यांच्या पाठिशी उभे आहेत.
शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा का दिला त्यासाठीचे काही कारणही सांगितले. त्यामागील खरी भूमिका काय ते शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल. स्वतंत्र राजकीय पक्ष या नात्याने शिवसेना भूमिका घेऊ शकते. पण, गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले. शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले. अशा स्थितीत त्या पक्षाने घेतलेली भूमिका समजण्या पलिकडील आहे.
उत्तर प्रदेशातील बुलडोझर कारवाई थांबवण्यास नकार; सर्वोच्च न्यायालय म्हणाले…
शिवसेना महाविकास आघाडीत आहे. पण, हा निर्णय घेताना त्या पक्षाने आमच्याशी काहीही चर्चा केली नाही, अशी खंत थोरात यांनी व्यक्त केली. राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांनी सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना पाठिंबा असणारे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. शिवसेनेतील बंडामुळे त्या आघाडीचे सरकार नुकतेच कोसळले.
राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस! गोदावरी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा