TOP 10 NEWS : ब्रेकअपचा बदला पडला महागात ते झिरवळांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला; जाणून घ्या आजच्या TOP 10 News
Top 10 News: राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी...

TOP 10 NEWS : 1. ब्रेकअपचा बदला पडला महागात; ६ जणांना अटक
‘लव्ह अँड हेट स्टोरी’मुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक (गट ब) पदाच्या चाळणी परीक्षेच्या पेपरफुटीचे रॅकेट उघडकीस आले. नंदुरबार येथील ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’प्राप्त अमृत पाटील याने मुलीसाठी एमपीएससी अधिकाऱ्यांशी १२ लाखांत औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरचा सौदा केला. मुलगी ऋतुजाने प्रेमापोटी हा फुटलेला पेपर तिचा बॉयफ्रेंड गौरव पाटील याला दिला. निकालानंतर ऋतुजा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली, परंतु त्यांच्यात वाद होऊन तिने लग्नाला नकार दिला.
ब्रेकअपच्या रागातून गौरवने ती अधिकारी बनू नये म्हणून एमपीएससीला ई-मेल करून पेपरफुटीची थेट तक्रार केली. पुढे अटकेच्या भीतीने ‘मस्करी केली’ असे सांगत त्याने तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या ई-मेलमुळे संशय बळावला आणि संपूर्ण रॅकेट उघडकीस आले. याप्रकरणी गुन्हे शाखेने एमपीएससीतील तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक केली आहे. त्यात नंदुरबारचा अकादमी संचालक, शाळेचा मुख्याध्यापक तसेच फार्मा कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
2. गणेशोत्सवा मंडळांच्या महाप्रसादासाठी नवा नियम? तुकाराम मुंढेंनी केले स्पष्ट
गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद आणि भंडाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून नवा नियम लागू करण्यात आला आहे का? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. यावर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. गणेशोत्सव, ईद किंवा इतर कोणताही सण यासाठी वेगळे नियम केलेले नाहीत.
अन्नविषयक व्यवसायांसाठी यापूर्वीपासूनच असलेले नियम आणि मानकांचे पालन करणे आवश्यक आहे, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, खाद्यपदार्थ देणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाने आवश्यक परवाना आणि नोंदणी करून नियमांनुसार अन्नपदार्थ पुरवणे अपेक्षित आहे. नियमांचे उल्लंघन होत असल्यास कारवाई केली जाईल; मात्र ही कारवाई केवळ गणेशोत्सवामुळे नाही, तर नियमित नियामक प्रक्रियेचा भाग आहे.
3. ‘खाऊन पिऊन आंदोलन करा’; झिरवळांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला
पुण्यातील मांजरी येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, आंदोलनस्थळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आमरण उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र, विद्यार्थी आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. जोपर्यंत मागण्यांबाबत लेखी जीआर मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. यादरम्यान, मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी, विद्यार्थ्यांना तुम्ही खाऊन पिऊन आंदोलन करा असा सल्ला दिला. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना असा सल्ला देऊन नरहरी झिळवळांनी या आंदोलनाची मस्करी केली आहे अशी चर्चा सुरू झाली.
4. रेल्वे फिरू देणार नाही, विमानं उडू देणार नाही; मुंबईत आंदोलनबंदीवरून जरांगे भडकले
मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. २९ ऑगस्टपासून उपोषण करण्याची घोषणा करत त्यांनी गरज पडल्यास पुन्हा मुंबईच्या दिशेने मोर्चा वळवण्याचा इशारा दिला आहे. आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईतील इतर ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा मोर्चांना मनाई करण्यात आली आहे. यावर बोलताना जरांगे म्हणाले की, मराठे मुंबईत येणार असल्यामुळेच सरकारने हे नियम लागू केले आहेत. मुंबईत येऊ नका असं सांगणं ही सरकारची दादागिरी आहे. आंदोलनाला विरोध केल्यास रेल्वे फिरू देणार नाही, तुमची विमानं उडू देणार नाही, असा आक्रमक इशारा जरांगे यांनी दिला.
5. “कुंभमेळ्यावरील खर्चात शाळा आणि…” इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया
नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात विकासकामांना वेग आला आहे. कुंभमेळ्यासाठी सरकारकडून तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार असल्याची चर्चा आहे. एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कुंभमेळ्यासाठी करण्यात येणाऱ्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “कुंभमेळ्यावर 30 हजार कोटी रुपये खर्च होतात; या पैशांतून किती शाळा किंवा IIT उभारता आल्या असत्या?” असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. सरकारची प्राथमिक जबाबदारी नागरिकांना चांगल्या शाळा आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याची आहे, असेही त्यांनी म्हटले.
6. “साखर आणखी महाग झाली तरी हरकत नाही”; भाजप मंत्र्यांचे विधान
“साखर आणखी महाग झाली तरी काही हरकत नाही, कारण आजकाल ९० टक्के लोक साखर खातच नाहीत,” असे वादग्रस्त विधान मध्य प्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी केले आहे. वाढत्या महागाईवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. “४० वयानंतर आरोग्य जपण्यासाठी लोकांनी साखर खाणे टाळले पाहिजे. फक्त मुलांसाठी सरकारी रास्त भाव दुकानांवर स्वस्त दराने” असा अजब तर्कही त्यांनी मांडला.
त्यानंतर सध्या साखरेचे दर कमी होत असल्याचे सांगत त्यांनी आपल्या विधानाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या या विधानावर मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जीतू पटवारी यांनी जोरदार पलटवार केला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते सर्वसामान्य जनतेचा अपमान करत असून, जनता आगामी निवडणुकीत त्यांना नक्कीच धडा शिकवेल, अशी टीका पटवारी यांनी केली.
7. “तीन वर्षांच्या मुली जेव्हा बुरखा घालतात तेव्हा…” कंगनाचा राहुल गांधींना सवाल
अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचे विचार सनातनविरोधी असल्याचे म्हटले आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या वादग्रस्त जाहिरातीचे राहुल गांधी यांनी समर्थन केले होते, त्यावर एका मुलाखतीत कंगनाने ही प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींवर टीका करताना ती म्हणाली की, “रक्षाबंधन हा धार्मिक सण असून त्याचे काही नियम असतात. राहुल गांधी यांना तीन वर्षांच्या मुली जेव्हा बुरखा घालतात तेव्हा त्यांना वाटत नाही की पितृसत्ताक पद्धती संपवली पाहिजे. त्यांना तर हे माहीतही नाही की बुरखा काय असतो. सनातनवर हल्ला करणं एवढाच त्यांचा अजेंडा आहे. त्यांची विचारसरणी अत्यंत मर्यादित आहे.
दरम्यान, ही जाहिरात मागे घेतली गेली त्याबाबत कंगणांने म्हंटले, “संबंधित जाहिरातीत पूजा, अक्षता, टिळा यांसारख्या हिंदू परंपरा वगळून संस्कृती पुसण्याचा प्रयत्न झाला होता, त्यामुळे ती मागे घेणे योग्यच होते.” TOP 10 NEWS
8. नेपाळमधील पुरानंतर भारतातही संकट! १४ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
तिबेटमधून आलेल्या भीषण पुरामुळे मध्य नेपाळमध्ये हाहाकार माजवला. भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरात शेकडो जण दगावल्याची भीती असून आतापर्यंत ९५ मृतदेह सापडले आहेत. तसेच नेपाळमधील त्रिशुली नदी पुढे भारतात येऊन गंडक नदी बनते. त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ३ मीटरपर्यंतची पुराची लाट येण्याची शक्यता असल्याने तिथेही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यातच उत्तर प्रदेश आणि बिहारसह १४ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि गुजरात या १४ राज्यांसाठी मुसळधार पावसासह वादळाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर हिला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महिलांच्या स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याची अधिकृत परवानगी दिली आहे. ट्रान्सवुमन झाल्यानंतर क्रिकेट कारकीर्द संपल्याची भीती वाटत असतानाच, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तिला महिलांच्या स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास अधिकृत परवानगी दिली आहे. यामुळे अनाया आता लवकरच मैदानावर महिला क्रिकेटपटू म्हणून आपली नवी इनिंग सुरू करताना दिसणार आहे. मात्र याकरिता मात्र एक अट पूर्ण गरजेचं आहे. टेस्टोस्टेरॉनची पातळी 12 महिन्यात 10 नॅनोमोल प्रति लीटर पेक्षा कमी करणे बंधनकारक आहे. महिला क्रिकेटमध्ये समान न्याय मिळावा यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा नियम ठेवला आहे.
10. “तुम्ही तुमच्याच शहरात पर्यटक झालात का?” श्रद्धाची मुंबई सफर
अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकतीच मुंबई शहराची एका पर्यटकाप्रमाणे सफर करत सोशल मीडियावर खास फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. कारमधील सेल्फी, रेस्टॉरंटमधील चविष्ट पदार्थ याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. सोबतच श्रद्धाने तिच्या कारमधून शूट केलेले दोन व्हिडीओही पोस्ट केले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये मुंबईचा महामार्ग आणि दोन्ही बाजूंना दिसणाऱ्या उंच इमारती पाहायला मिळतात. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला असलेला गर्दीने फुललेल्या बाजाराचे दृश्य दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत तिने “तुम्ही कधी तुमच्याच शहरात पर्यटक झाला आहात का?” असा प्रश्न चाहत्यांना विचारला असून, या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. TOP 10 NEWS
हेही वाचा:








