कृत्रिम बुद्धिमत्तेकडे आव्हान नव्हे तर संधी म्हणून पाहा; केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांत मजुमदार यांचे प्रतिपादन

पुणे – कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही शिक्षकांना पर्याय ठरू शकत नाही. मात्र, मूल्यमापन, नावीन्यपूर्ण प्रयोगांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्तेकडे आव्हान नाही, तर संधी म्हणून पाहायला हवे, असे मत केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांत मजुमदार यांनी आज येथे व्यक्त केले.
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटतर्फे आयोजित परिषदेचे उद्घाटन मुजुमदार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आयआयएम अहमदाबादचे संचालक प्रा. भारत भास्कर, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराय मेत्री, प्रा. रवीकुमार जैन, डॉ. चंदन चौधरी, पीआयबीएमचे अध्यक्ष रमण प्रीत, संचालक डॉ. राजश्री पिल्लई या वेळी उपस्थित होते.
कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण अधिक सुलभ करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, असे सांगून मजुमदार म्हणाले, बहुविद्याशाखीय दृष्टिकोन, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पथदर्शी ठरणार आहे. तसेच देशाला नवंसकल्पना आणि शिक्षणाच्या क्षेत्रात ‘ग्लोबल हब’ म्हणून घडवण्याचे उद्दिष्ट आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही आता केवळ संकल्पना राहिलेली नाही, तर परिवर्तनाचे साधन होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वरुपात शिक्षण देणे शक्य होऊ शकेल.
विद्यार्थ्यांमधील उणीवा, बलस्थाने हेरून त्यांना त्यांच्या कुवतीनुसार शिक्षण देता येईल. दरम्यान, पीआयबीएमने आजवर आपले वेगळेपण अधोरेखित केले आहे. पुस्तकी शिक्षणापेक्षा अनुभवावर भर दिला आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विविध क्षेत्रात वापरली जाणार आहे. त्यामुळे नव्या संधी निर्माण होणार आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधनाची गरज आहे, असे रमणप्रीत यांनी सांगितले.





