Pune : “आरटीई’साठी शाळांचा निरुत्साह

पुणे : आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी यंदा शाळा निरुत्साही असल्याचे चित्र आहे. गेल्या दहा दिवसांत राज्यातील २ हजार ३५४ शाळांनी नोंदणी करत ३२ हजार ९४० प्रवेशाच्या जागा दर्शविल्या आहेत. यंदा ही प्रक्रिया लवकर सुरू करण्यात आली आहे. १८ डिसेंबरपासून शाळांना आरटीई पोर्टलवर नोंदणी प्रक्रियेसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत व इतर पालकांनी शिक्षण संचालक शरद गोसावी व सहसंचालक यांना आरटीई प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते. त्याची दखल घेण्यात आलेली आहे. ३१ डिसेंबर पर्यंत शाळा नोंदणी प्रक्रिया चालू राहून जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अर्ज नोंदणी सुरू होऊ शकते, असे सांगत शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी आप पालक युनियनच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
शिक्षण हक्काचा उद्देश तसेच त्यामधील जन्मदाखला, स्पेलिंग मधील किरकोळ चुका, पत्त्यामधील तांत्रिक चूका याबाबत पडताळणी समिती व शिक्षणाधिकारी यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तसेच यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी पडताळणी समितीत पालक , संघटना प्रतिनिधी घ्यावेत, अशी मागणीही आम आदमी पार्टी, आप पालक युनियनने राज्य शासनाकडे केलेली आहे.
आतापर्यंत सर्वाधिक कोल्हापूर जिल्ह्यातून २४५ शाळांची नोंदणी झालेली असून २ हजार ६४४ प्रवेशाच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत. पुणे जिल्ह्यातून १५२ शाळांनी नोंदणी करत २ हजार ७१६ जागांची नोंदणी केली आहे. अहमदनगर – २५६, ठाणे – २१०, यवतमाळ – १२९, सोलापूर – १००, पालघर- १६४, नाशिक- ११९, कोल्हापूर- २४५, लातूर- १४४, मुंबई – १८९, नागपूर-११४ याप्रमाणे शाळांची नोंदणी झालेली आहे.




