पावसाळी अधिवेशनात जनहिताचे निर्णय घेतल्याचे समाधान; उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचाच असला तरीही या अधिवेशनात जनतेच्या हिताचे कामकाज करता आले याचे समाधान आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या अधिवेशनात 9 विधेयके दोन्ही सभागृहांनी मंजूर केली.
या दोन दिवसांच्या अधिवेशनात झालेल्या कामकाजाविषयी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी माहिती दिली, मराठा आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याची केंद्र शासनाला शिफारस करणारा ठराव, ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळविण्याचा ठराव, 2014 च्या ईएसबीसी उमेदवारांना मोठा दिलासा.
तात्पुरत्या नियुक्त्या, वयोमर्यादेत वाढ, लवकरच महाराष्ट्र आयोगामार्फत 15 हजार 515 वर्ग एक आणि वर्ग दोनची पदे भरणार; तसेच आयोगातील सदस्यांची रिक्त पदे 31 जुलैपर्यंत भरणार, केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्यांत सुधारणा करून नवे विधेयक सादर, आरोग्य विभागास प्राधान्याने निधीबाबतच्या पुरवणी मागण्या, कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा ठराव, लसीकरण दरमहा वाढीव 3 कोटी डोसेस केंद्राकडून घेण्याबाबत ठराव करण्यात आले, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.




