Satara ZP Election – कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा जिल्ह्यावर असलेला प्रभाव कमी होऊन भाजपची एकसंघ ताकद वरचढ होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मंत्री जिल्ह्याच्या विकासासाठी आणि भाजप पक्षवाढीसाठी रात्रंदिवस परिश्रम घेत असल्यानेच जिल्ह्यातील सत्तास्थाने आमच्याकडे येऊ लागली आहेत. भाजपच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासाचे मोठे पर्व उभे राहत आहे. आमची एकसंघ ताकदच आता जिल्हा परिषदेवरही भाजपचा झेंडा फडकवेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ‘‘जिल्ह्यावर यशवंतराव चव्हाण, शरद पवारांपासून किसन वीर, प्रतापराव भोसले, विलासराव पाटील उंडाळकर, लक्ष्मणराव पाटील, पृथ्वीराज चव्हाण, रामराजेंच्या विचारांचा पगडा राहिला आहे. जिल्ह्यानेही त्यांच्यावर प्रेम केले. जिल्हा बॅंक आणि राज्य बॅंकेवर दोन्ही कॉंग्रेसची सत्ता असणे तसेच जिल्ह्यातील संस्थानिकांचे कारखाने चालवायचे असल्याने सर्वजण त्या व्यवस्थेबरोबर राहिले. बारामतीपासून हाकेच्या अंतरावर असल्याने जिल्ह्यातील संस्थानिकांना पवारांचा आधार घ्यावा लागला. २००७ पासून परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. माणमधून जिल्हा परिषदेवर मी निवडून गेलो. नंतर मी विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवून जिंकलो. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या साम्राज्याला सुरुंग लागायला सुरुवात झाली.’’ उदयनराजे भोसले- शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपमध्ये आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मार्गदर्शन आणि भक्कम पाठबळ मिळाले. जिल्हाभर एक एक कार्यकर्ता जोडत गेलो. फलटणमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बरोबर घेऊन वाटचाल केली. खंडाळ्यात अविनाश धायगुडेंच्या पश्चात त्यांच्या गट मजबूत आहे. शिरवळ, खंडाळ्यात भाजपची चांगली टीम तयार झाली आहे. वाईतही तीच परिस्थिती आहे. मंत्री मकरद पाटील, खा. नितीन पाटील असतानाही त्यांचा प्रभाव कमी होत आहेहे नगरपालिका निवडणूक निकालानंतर जिल्ह्यालाही जाणवले. मकरंद पाटील यांचा कायम विरोध करणाऱ्या विराज शिंदे, बापू शिंदेंना त्यांना जवळ करावे लागतेय ही त्यांची मजबूरी आहे. गेल्या वेळी भरगुडे पाटलांच्या विरोधात खेळलेली चाल त्यांच्यावर उलटविण्याची तयारी आम्ही तीन वर्षांपासून केली आहे. भरगुडे पाटील, पिसाळ कुटुंबीय, नितीन सावंत आमच्याकडे आल्याने वाईत सर्वत्र तुल्यबळ लढती अपेक्षित आहेत,सा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अनेक षडयंत्रे रचून माझे राजकारण संपविण्याचा रामराजेंनी कायम प्रयत्न केला. ते मंत्री, पालकमंत्री असताना वीस वर्षे मी आणि रणजितसिंहांनी जोरदार संघर्ष केला. फलटण विधानसभा जिंकली. नगरपालिका निवडणुकीत रणजितसिंहांनी रामराजेंच्या सत्तेला सुरुंग लावला. आता जिल्हा परिषद निवडणुकीतही तेथे भाजप वरचढ ठरणार आहे. कोरेगावमध्ये तत्कालीन पालकमंत्री शशिकांत शिंदेंबरोबर माझा कायम संघर्ष झाला. त्या भागात माझा गट सुरुवातीपासूनच निर्णायक ठरला आहे. महेश शिंदे कोरेगावात आल्यावर त्यांनाही यश मिळाले. आजही तिथे निर्णायक ताकद असणारा गट कार्यरत आहे. जयकुमार गोरे कराड उत्तरेतही तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटलांशी माझा संघर्ष झाला. तिथेही आमची मजबूत टीम आहे. धैर्यशील कदम यांना थांबवून मनोज घोरपडेंना विधानसभेत पाठवायची आमची चाल यशस्वी ठरली. रहिमतपूरमध्ये अनेक वर्षांची सत्ता उलथवून आमचे नगराध्यक्ष विराजमान झाले आहेत. कराड दक्षिण व उत्तरमध्येही जिल्हा परिषद निवडणूकीत भाजप वरचढ ठरण्यात अडचण नाही. पाटणमध्ये भाजपचे अस्तित्व नगण्य होते. खा. उदयनराजे, ना. शिवेंद्रराजे यांच्या माध्यमातून आम्ही पाटणकरांना भाजपध्ये सन्मानाने आणण्यात यशस्वी झालो. मुख्यमंत्र्यांसह आम्ही सर्वजण त्यांना लागेल ती ताकद देत आहोत. पालकमंत्री देसाईंविरोधात लढतानाही पाटणमध्ये आता तुल्यबळ लढती होणार आहेत. महाबळेश्वर, जावळी, पाचगणीतही नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांमधील निसटते निकाल पाहता भाजप मुसंडी मारण्यात यशस्वी होईल, असा विश्वासही ना. गोरे यांनी व्यक्त केला. ना. शिवेंद्रसिंहराजे आणि ना. जयाभाऊंचे ट्युनिंग …. जिल्ह्यात प्रथमच बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे या भाजपच्या हेवीवेट नेत्यांचे चांगले ट्युनिंग जुळल्याचे दिसत आहे. दोघेही एकमेकांना विश्वासात घेऊन भाजपची वाटचाल वेगवान करताना दिसत आहेत. दोघांनीही जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकविण्याचा निश्चय केला आहे. दोन्ही मंत्री आणि खा. उदयनराजेंच्या पाठीशी राहून जिल्ह्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी कामाला लागल्याचे चित्र भाजपच्या गोटात पाहयला मिळत आहे.