Satara ZP Election : औंध गटात ‘विकासाची गंगा’ येणार; भारतीताई गोरे आणि दादासाहेब इंगळे यांचा निर्धार
Satara ZP Election : भारतीताई गोरे आणि दादासाहेब इंगळे यांच्याकडून विकासाचा लेखाजोखा सादर; घरोघरी जाऊन मतदारांशी साधला थेट संवाद.

Satara ZP Election – विकासाच्या गंगेतून औंध जिल्हा परिषद गटाचा कायापालट होणार असल्याचा ठाम विश्वास गटातील भाजपच्या उमेदवार भारतीताई गोरे आणि औंध गणाचे उमेदवार दादासाहेब इंगळे यांनी व्यक्त केला.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत औंध गटातील भाजपच्या उमेदवार भारतीताई गोरे आणि गणातील उमेदवार दादासाहेब इंगळे यांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे.
पदयात्रांद्वारे घरोघरी गाठीभेटी, मतदारांशी संवाद साधून, दोन्ही उमेदवार विकासाचा लेखाजोखा मांडत आहेत. आतापर्यंत केलेली कामे आणि प्रस्तावित विकासकामांची मांडणी त्यांनी केली. भारती गोरे यांनी गटातील प्रत्येक गाव आणि वाड्यावस्त्यांमधील नागरिकांशी संवाद साधून, पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिला व युवकांसाठीच्या योजनांचा आढावा घेतला.
अंकुशभाऊ गोरे यांनी गटात आतापर्यंत केलेली विकासकामे आणि विविध योजनांमधून आणलेल्या निधीची माहिती देताना, पुढील टप्प्यातील प्राधान्यक्रम भारतीताईंनी जनतेला सांगितला.त्या म्हणाल्या, औंधसाठी निधी, योजना आणि कामांची गती वाढवली जाणार आहे. पिण्याचे पाणी, सिंचन, रस्ते, पर्यटन आणि रोजगारनिर्मिती यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या विकासाच्या गंगेतून औंध गटाचा कायापालट घडवण्याचा निर्धार आहे. संघटनात्मक ताकद, अनुभवी नेतृत्व आणि विकासदृष्टी असल्याने, भाजपसाठी औंध गटात मजबूत वातावरण निर्माण झाले आहे.
समस्यांवर ठोस उपाययोजना करणार
औंध गणाचे उमेदवार दादासाहेब इंगळे यांनी एकाच दिवसात संपूर्ण गणाचा दौरा करून, प्रचारात केला. पहाटेपासून रात्रीपर्यंत गावभेटी, बैठकांमधून नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी विकासाचा ठोस आराखडा मांडला. नागरिकांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.





