Satara Rain Update: नीरा नदीकाठच्या गावांना इशारा! जिल्ह्यात पावसाची शंभरी पार; पाहा कोणत्या तालुक्यात किती झाला वर्षाव?
Satara Rain Update: वीर धरणाची पातळी नियंत्रित करण्यासाठी ६३ हजार ३२३ क्युसेक पाण्याचा नीरा नदीत विसर्ग; नदीकाठच्या गावांना खबरदारीचा इशारा.

Satara Rain Update – जुलै महिन्याच्या अखेरीस सातारा जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन करत समाधानकारक हजेरी लावली आहे. 1 जून ते 31 जुलै या कालावधीत जिल्ह्यात सरासरी 518.3 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, ती सरासरीच्या 103.4 टक्के आहे. केवळ 31 जुलै रोजी जिल्ह्यात 28 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांसह धरणांच्या पाणीसाठ्याबाबत दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात खंडाळा तालुक्याने सर्वाधिक 176.7 टक्के पावसाची नोंद करत आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ वाई (154.2%), फलटण (126.8%), कराड (114.9 टक्के), खटाव (112.2 टक्के) आणि जावळी (130.4 टक्के) या तालुक्यांमध्येही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दुसरीकडे, सातारा (85.8 टक्के), पाटण (81.4 टक्के), माण (73.1टक्के ),
महाबळेश्वर (81.9 टक्के) या तालुक्यांमध्ये अद्याप सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असून, पुढील काही दिवसांच्या पावसाकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. कोरेगाव तालुक्यात 94.4 टक्के पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यात 1 जूनपासून 2,549.7 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, त्यातील महाबळेश्वर शहरातच 4,638.5 मि.मी. पाऊस झाला आहे. जावळी तालुक्यातील बामणोली येथे 1,510.6 मि.मी., तर पाटण तालुक्यातील हेलवाक येथे 1,567.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
पाणी सोडल्याने नीरा नदीला आलेला पूर
खंडाळा तालुक्यातील वीर धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आज (दि. 31) दुपारी 4 वाजता धरणाच्या सांडव्यावरून 62 हजार 924 क्युसेक, तर अतिवाहकाद्वारे 1 हजार 400 क्युसेक, असा एकूण 63 हजार 323 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. या विसर्गामुळे नीरा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून, नदीवरील ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेला आहे.
पाण्याची पातळी वाढल्याने खंडाळा तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, पुलावरून किंवा नदीकाठच्या धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे तसेच नदीकाठच्या परिसरात अनावश्यक वावर करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाचे प्रमाण तसेच वीर धरणात होणारी पाण्याची आवक यानुसार विसर्गाच्या प्रमाणात पुन्हा वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे.





