Satara DCC Bank Election: मालखेड ते करहर संघर्षाची मालिका! जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहलीचे राजकारण; नेमकं काय शिजतंय?
Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वीच सहकार क्षेत्रात वादाची ठिणगी; सोसायट्यांच्या ठरावांवरून जावली तालुक्यात भाजप-राष्ट्रवादी गट आमनेसामने.

Satara DCC Bank Election- सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे घोडामैदान अद्याप दोन महिने दूर असतानाच जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणाला चांगलीच धार आली आहे. भावी संचालकांच्या हालचालींना वेग आला असून, सोसायट्यांचे ठराव आपल्या बाजूने वळविण्यासाठी पडद्याआडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे ठरावांवरून होणारे वाद आता थेट गुद्द्यापर्यंत पोहोचू लागल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वीच सहकारातील वातावरण ढवळून निघाले आहे. ठराव कोणाच्या बाजूने, कोणाचा शब्द अंतिम आणि सहकार संस्थांवर प्रभाव कोणाचा, या प्रश्नाभोवती स्थानिक राजकारण तापत असल्याचे चित्र आहे.
मालखेडपासून करहरपर्यंत संघर्षाची मालिका
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यातील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होताना दिसत आहे. मालखेड येथील चाकूहल्ल्याच्या घटनेनंतर आखाडे येथे ठरावाच्या मुद्द्यावरून शिंदे गट आणि शिवेंद्रसिंहराजे गट आमनेसामने आल्याची चर्चा झाली. त्यानंतर काही सोसायटी सचिवांच्या हालचालींबाबतही विविध चर्चा सुरू झाल्या.
त्यातच खामगाव येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यात धुमसाधुमशी झाल्याने जावली तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे .आता ज्यांच्या नावावर ठराव झाले आहेत,
अशा पदाधिकारी व संचालकांना जिल्ह्याबाहेर सहलीला पाठवल्याच्या चर्चेने या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. या सर्व घडामोडींमुळे सहकाराच्या संस्थांमध्ये परस्पर सहकार्यापेक्षा राजकीय वर्चस्वासाठीची रस्सीखेच अधिक तीव्र झाली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
2007 नंतर राष्ट्रवादीचे वर्चस्व; आता भाजपची नजर
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सहकार, आर्थिक शिस्त आणि कार्यक्षम व्यवस्थापनाची मोठी परंपरा लाभली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका उंडाळकर यांनी या परंपरेला बळ दिले. 2007 नंतर जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले आणि ते कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने सातत्याने प्रयत्न केले. मात्र, गेल्या काही वर्षांत सातारा जिल्ह्यात भाजपची राजकीय ताकद वाढल्याने आता जिल्हा बँकही आपल्या ताब्यात आणण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे राजकीय संकेत आहेत.
शंभूराज देसाईंची ‘अलिप्तता’ की नवी खेळी?
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा बँकेशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले असले तरी त्यांच्या एका सूचक वक्तव्याने राजकीय चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या सत्तासंघर्षातील जखमा अद्याप सुकलेल्या नाहीत, असा राजकीय अर्थ त्यांच्या वक्तव्याचा काढला जात आहे. शिंदे गटाचे सातारा जिल्ह्यातील राजकीय वजन आणि भाजपसोबतचे सत्तासमीकरण पाहता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘दे धक्का’ राजकारण पुन्हा रंगणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.






