“धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला इतका उशीर का? ” ; बजरंग सोनावणेंचा राज्य सरकारला सवाल

Santosh Deshmukh Murder Case । बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याचे चार्जशीटच्या माध्यमातून स्पष्ट झाले. त्यातच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धक्कादायक फोटो समोर आल्यावर काल रात्री उशिरा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे म्हटले जात आहे. आता यावरून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला इतका उशीर का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
राजीनाम्यासाठी एवढा उशीर का झाला? Santosh Deshmukh Murder Case ।
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याविषयी बोलताना, “कालची जी घटना घडली, ती घटना संपूर्ण महाराष्ट्राला पिळवटून टाकणारी आहे. राजीनाम्यासाठी एवढा उशीर का झाला? आमच्या तोंडातून शब्द निघत नाही, असं वाईट कृत्य त्या फोटोमधून समोर आलेले आहे. इतकं सगळं असताना का हा विषय इतका का लांबला? एकदाच सांगा ना, राजीनामा मंजूर केला किंवा हकालपट्टी केली. या सर्व मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे. लढा देण्यासाठी सत्तेतले आमदार, लोकप्रतिनिधी, विरोधक सर्व जनता लढत आहे. तेव्हा कुठे तरी राजीनामा होत आहे. आता समजलं की, मुख्यमंत्री राजीनाम्यासाठी पहिल्यापासून आग्रही होते, आता कोणी अजित पवारांचे नाव घेतंय, आम्हाला काय त्याच्याशी देणे घेणे नाही.
जे गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशी झाली पाहिजे Santosh Deshmukh Murder Case ।
पुढे बोलताना सोनावणे यांनी,”देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा. आरोपींना ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या घटनेतील प्रत्येक बाबीची चौकशी व्हायला पाहिजे. घटनेतील आरोपी अजूनही मोकाट फिरत आहे. त्या सर्वांवर आरोपपत्र दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्यावर मकोका लावला पाहिजे. त्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे. जेलमधील सीसीटीव्ही बंद करणे म्हणजे निर्लज्जपणा आहे. मदत करणाऱ्या पोलिसांवरही मकोका लावावा. जे गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशी झाली पाहिजे, “अशी थेट मागणी सोनावणे यांनी यावेळी केली.





