Sanjay Shirsat : … तो माणूस फक्त वेळेची वाट पाहतोय”; संजय शिरसाट यांचे ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याबाबत मोठं विधान

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसताना दिसत आहेत. अनेक नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार आणि नेते राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यादरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट ?
“भास्कर जाधव यांनी तुमची भूमिका आवडत नाही, हे वारंवार सांगितलेला आहे. भास्कर जाधव हा रांगडा माणूस आहे. शिंदे साहेबांच्या स्वभावाला मॅच असणारा माणूस आहे. तुम्ही कितीही त्याच्या आरती ओवाळायचा प्रयत्न केला तरी सुद्धा भास्कर जाधव तुमच्याकडे आता राहणार नाही. तुम्ही कितीही तारीफ करून, साहेब म्हणून काहीही केलं तरी आता भास्कर जाधव त्यांच्याबरोबर राहणार नाही हे जवळपास आता निश्चित झालेला आहे. तो माणूस फक्त वेळेची वाट पाहत आहे असे संजय शिरसाट म्हणाले.
संजय राऊतांवर टीका
“मुंबईत जवळपास 35 नगरसेवक आले. संभाजीनगरमध्ये 20 ते 22 नगरसेवक आले, सहा महापौर आले. मला सांगा उद्धव ठाकरे गट राहिला तरी कुठे? डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कोण कुठे जाते, हे करण्यापेक्षा आपला पक्ष कुठे चाललाय याकडे लक्ष द्या. पक्षाची तुमची असलेली वाताहात थांबवण्यासाठी त्याला काही बडबड करून पक्ष वाढत नसतो. हे त्यांना कधी कळेल देव जाणे,” असे म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीका केली.





