Sanjay Raut : ठाकरेंनी माकडांची माणसं केली; सोडून गेलेल्यांना टोला लगावत संजय राऊतांची वर्धापन दिनी तुफान फटकेबाजी

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेना (उबाठा) गटाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. “निवडणूक आयोग किंवा अमित शाह ठरवणार नाहीत की शिवसेना कुणाची आहे. उद्या आम्ही ठरवू की अमित शाह देशात राहातील की तुरुंगात,” असा घणाघाती टोला राऊत यांनी लगावला.
राऊत म्हणाले, “गेल्या ६० वर्षांत शिवसेनेला अनेक संकटांचा सामना करावा लागला. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घडवलेली माणसं मोठी पदं मिळाल्यावर सोडून गेली. ठाकरेंनी माकडांची माणसं आणि सरदार केले, पण त्या सरदारांनी पाठीत खंजीर खुपसला. तरीही शिवसेना कधी झुकली नाही, वाकली नाही.” त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. “या भूतलावर ५६ इंच छातीवाले असतील, पण ट्रम्पचा एक फोन येतो आणि ते सरेंडर करतात. आमच्या नेत्यांना अनेक दबाव आणि फोन आले, पण आम्ही कधी सरेंडर केलं नाही. सरेंडर करणं हे नरेंद्र आणि देवेंद्र यांचं काम आहे, आमचं नाही,” असा टोमणा त्यांनी मारला.
पुढे बोलताना राऊत यांनी काश्मीरमधील सुरक्षा स्थितीवरून केंद्र सरकारला धारेवर धरले. “काश्मीर हे देशाचं महत्त्वाचं अंग आहे. पहलगाममध्ये चार अज्ञात अतिरेकी बंदूक घेऊन येतात आणि धर्म विचारून आमच्या माय-भगिनींच्या कपाळावरचं कुंकू पुसतात. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या या हल्ल्यातील अतिरेक्यांचा शोध ५६ इंचाच्या सरकारला अजून लागला नाही. ते अतिरेकी कुठे गेले? आकाशात, पाताळात की जमिनीत? गृहमंत्र्यांना त्यांचा पत्ता लागला नाही,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.
“तुम्ही पाकिस्तानवर बॉम्ब आणि मिसाइल टाकलं, पण प्रश्न जैसे थे आहे. माय-भगिनींचं कुंकू पुसणारे अतिरेकी अजून मोकाट आहेत,” असे म्हणत त्यांनी गृहमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या कार्यक्रमात राऊत यांनी शिवसेनेच्या संघर्षमय इतिहासाचा उल्लेख करत कार्यकर्त्यांना संताप आणि चीड व्यक्त करण्याचे आवाहन केले. “या देशात काय चाललंय? आपण चिडलं पाहिजे, संतापलं पाहिजे,” असे सांगत त्यांनी शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण केला.





