“‘बिनशर्ट’ पाठिंबा देणारे आता स्वबळाची भाषा करतात, ही अपशकुनाची सुरुवात” ; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

Sanjay Raut on Raj Thackeray। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मोठ्या पक्षांनी आपापली ताकद पाहण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, या सगळ्यात काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेत स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले. त्यावरून आता शिवसेना (ठाकरे गट ) यांच्याकडून टीका करण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी लोकसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आणि आता एका महिन्यात त्यांची भुमिका बदलली आहे. काही पक्ष महाराष्ट्र विरोधी भुमिका घेण्यासाठी बनले आहेत. मुंबई लुटणाऱ्यांना शक्तींना मनसे पाठीबा देत असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ही तर विधानसभेच्या अपशकुनाची सुरुवात झाल्याचे देखील राऊत म्हणाले.
मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी, राज ठाकरे नुकतेच परदेशातून आलेत, बराच काळ ते परदेशात होते, त्यामुळे त्यांना राज्यात काय चाललंय हे समजून घ्यायला थोडा वेळ लागेल. काही दिवसापूर्वी त्यांनी मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बिनशर्ट म्हणजे उघडा पाठिंबा दिला होता, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. बिनशर्त पाठिंबा दिला जणू काही महाराष्ट्रावर फार मोठे उपकार करण्यासाठी, मोदी आणि शहांचा जन्म झालाय. ज्या महाराष्ट्रात मोदी शाहांना पाय ठेवू देणार नाही असं जे म्हणाले होते, त्यांना राज ठाकरेंनी बिनशर्ट पाठिंबा दिलाय.. आणि आता एकाच महिन्यात त्यांची भूमिका बदलली. ते आता 288-225 जागा लढणार आहेत. हे आश्चर्यकारक आहे, तो त्यांचा पक्ष, त्यांची भूमिका आहे.
विधानसभेत अपशकुन करण्यासाठी काही पक्ष Sanjay Raut on Raj Thackeray।
महाराष्ट्रातील विधानसभेत अपशकुन करण्यासाठी महाराष्ट्रातील स्वाभिमानी पक्षांना ही पावलं उचलली जात आहेत का हे पाहावं लागेल, यावर आता फार बोलण्यात अर्थ नाही. काही व्यक्ती, काही संघटना, काही पक्ष हे सतत महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका घेण्यासाठीच निर्माण झालेल्या आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी पक्ष पहिल्यापेक्षा खूप मजबूत Sanjay Raut on Raj Thackeray।
दरम्यान, “‘लाडकी बहीण आणि लाडका भाऊ’ एकत्र असते तर पक्ष टिकला असता” असे राज ठाकरे म्हणाले, यावर संजय राऊत यांनी,” राष्ट्रवादी पक्ष पहिल्यापेक्षा खूप मजबूत आहे. शरद पवारांच्या पक्षाने कधी नव्हे ते इतकं मोठं यश मिळवलं. पक्ष हलला नाही, 8 लोकसभेच्या जागा पवारांच्या नेतृत्त्वात जिंकल्या. हे पक्ष टिकल्याचे लक्षण आहे. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह काढून घेऊन सुद्धा आम्ही ताकदीने लढलो, 9 जागा जिंकल्या. खरे पक्ष कोणते हे लोकांना माहिती आहेत,” असे संजय राऊत म्हणाले.





