‘भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा’ ; संजय राऊतांची भाजपवर टीका

Sanjay Raut on BJP। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिल्याने राज्यात मोठा राजकीय गोधळ निर्माण झालाय. त्यातच मविआच्या नेत्यांनी भाजप आणि अशोक चव्हाण यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलीय. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाची काल सभा झाला. त्यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी जाहीर सभेत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक जुनी ऑडियो क्लिप वाजवून दाखवली. ज्यामध्ये फडणवीस अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना ऐकायला येतंय.
पुढे संजय राऊत यांनी,”काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये या देशातला सर्वात मोठा आदर्श बिल्डिंगचा घोटाळा झाला. चार मळ्याची सैनिक हुतात्मे यांच्यासाठी बिल्डिंग बांधायची होती. पण अशोक चव्हाणांनी ३४ माळे चढवले. भारतीय जनता पक्ष अशोक चव्हाण यांना तुरुंगात टाकायला निघाला होता. आज त्याच भारतीय जनता पक्षानं अशोक चव्हाण यांना त्यांच्या पक्षात घेतलं”, अशी खोचक टीका केली.”
मोदी-फडणवीसांची ‘ती’ ऑडियो क्लिप वाजवली Sanjay Raut on BJP।
पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभांमधून अशोक चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेची ऑडिओ क्लिप ऐकवली. “दोन-तीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहेत हे नांदेडमध्ये येऊन सांगितलं. देवेंद्र फडणवीसांनीही त्यांच्यावर टीका केली होती. ‘अशोक चव्हाण नांदेडमध्ये विकास करू शकले नाहीत. कारण ते लीडर नव्हे, डीलर आहेत. नांदेडला लीडरची गरज आहे. लीडर म्हणून प्रतापपाटील चिखलीकर यांची गरज आहे’, असे फडणवीस म्हणाले होते.
‘भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा’ Sanjay Raut on BJP।
“हल्ली घोटाळा करायचा आणि भारतीय जनता पक्षात जायचं असं चाललंय. एक नवीन नारा आलेला आहे. ‘भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा’. आज हा नारा अशोक चव्हाण यांनी दिलेला आहे”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
“भाजपानं आमच्याकडचे ४० घेतले, अजित पवारांसोबत ४० घेतले आणि आता काँग्रेसचे ५-१० घेतील. हा भारतीय जनता पक्ष आहे. मला तर असं वाटतंय की आता संघाच्या शाखा काँग्रेसच्या कार्यालयात भरतील. महाराष्ट्रात भ्रष्टाचार, गुंडगिरी, चोऱ्या करणाऱ्यांचं राज्य आलंय”, असे राऊत यावेळी म्हणाले.





