वक्फ विधेयकावरून ‘इंडिया’ आघाडीत फूट: काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात, संजय राऊत म्हणाले- आमच्यासाठी प्रकरण संपलं

नवी दिल्ली: वक्फ संशोधन विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांतून मंजूर झालं असून, सरकार हे आपलं मोठं यश मानत आहे. मात्र, विरोधकांनी याला मुस्लिम हक्कांविरोधी ठरवलं आहे. दरम्यान, वक्फ विधेयकावरून ‘इंडिया’ आघाडीत एकमत दिसत नाही. डीएमके आणि काँग्रेसने या विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असताना, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलं की, ते सर्वोच्च न्यायालयात जाणार नाहीत.
संजय राऊत काय म्हणाले?
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही. आमचं काम पूर्ण झालं आहे. जे बोलायचं होतं, जे सांगायचं होतं, ते आम्ही संसदेच्या दोन्ही सभागृहांत बोललो आहोत. आमच्यासाठी हे प्रकरण आता बंद झालं आहे.” पुढे ते म्हणाले, “जो कोणी हे विधेयक हिंदुत्वाशी जोडण्याचा प्रयत्न करत असेल, त्याच्याइतका मूर्ख दुसरा कोणी नाही. खरंतर सरकारला या विधेयकाद्वारे वक्फ मंडळाच्या मालमत्तांवर उद्योगपतींचा कब्जा सोपा करायचा आहे.”
संसदेत काय म्हणाले होते राऊत?
संजय राऊत यांनी संसदेतही या मुद्द्यावर जोरदार भाषण केलं होतं. त्यांनी थेट मोहम्मद अली जिन्नांचा उल्लेख करत सरकारवर हल्ला चढवला होता. ते म्हणाले होते, “मी सगळ्यांचं भाषण ऐकलं, गृहमंत्र्यांचं, कायदा मंत्र्यांचं. जिन्नांनी जितकी काळजी घेतली नसेल, तितकी तुम्ही सगळे कालपासून घेत आहात. एकदा तर मला वाटलं, जिन्नांची आत्मा कबरेतून उठून तुमच्या शरीरात शिरली की काय! आम्हाला वाटायचं की आपण सगळे मिळून हिंदू राष्ट्र घडवतोय, पण आता वाटतंय की तुम्ही तर हिंदू पाकिस्तान बनवत आहात.”
दरम्यान, या विधेयकावरून आघाडीत मतभेद स्पष्ट झाले असून, याचा परिणाम पुढील राजकीय समीकरणांवर कसा होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.





