Sanjay Raut । राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार 12 डिसेंबर रोजी 85 वा वाढदिवस साजरा करत आहेत. ‘शरद पवार’ हे भारतीय राजकारणातील मोठं नाव. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रिय कृषीमंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पेलवल्या आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. शरद पवार हे आज दिल्लीतच असून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महायुती सरकारच्या खातेवाटपाच्या चर्चेसाठी अजित पवारही नवी दिल्लीतच आहेत. त्यानिमित्तानेच अजित पवार पत्नी तसेच राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्यासहीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरेही अजित पवारांबरोबर होते. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारही यावेळेस त्यांच्यासोबत होते. यावेळी त्यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अजितदादा सहकुटुंब भेटीला आल्याबद्दल संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारली असता, मग मी काय करु? असा प्रतिप्रश्नच राऊत यांनी विचारला. बातम्या तुम्ही काही करु शकता. अजित पवार असतील, प्रफुल पटेल असतील किंवा शरद पवार यांच्या संकट काळात साथ सोडून गेलेले अनेक जण असतील, शेवटी असा एक प्रसंग असतो. शरद पवार हे एक महान व्यक्तिमत्त्व आहे, महाराष्ट्राचा आधारवड आहेत. त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय निष्ठावंत असतील किंवा अन्य असतील, त्यांना शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकता येणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. भेटीनंतर अजित पवार नेमकं काय म्हणाले? पाहा… यावेळी अजित पवारांनी भाष्य केले. ‘आम्ही इन जनरल विषयांवर चर्चा केली. चहा, पाणी, नाश्ता केला आणि निघालो’, असे अजित पवार म्हणाले. आम्ही शरद पवारांसोबत अनेक विविध विषयांवर चर्चा केली. इथे काय सुरु आहे, तिथे काय सुरु आहे, अशा विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. परभणीला काय घडलं यांसह इतर महत्त्वाच्या घडामोडींवरही आम्ही बोललो. इन जनरल चर्चा झाली. लोकसभा, राज्यसभा का कमी चालली? मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, अधिवेशन केव्हा आहे, यावरही चर्चा केली. चहा पाणी नाश्ता झाला, आता निघालो, असे अजित पवारांनी म्हटले.