Sanjay Raut : मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे फोटो शेअर करत त्यांच्यावर टीका करत आहे. इतकेच काय तर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची हत्या केली त्या मॉरिस भाईचा शिंदेंबरोबरचा फोटो देखील राऊत यांनी एक्सद्वारे शेअर केला होता. त्यानंतर आता राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंबरोबर सेल्फी काढणाऱ्या एका गुंडाचा फोटो शेअर केला आहे. ज्यावरून त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी आव्हान दिले आहे.
संजय राऊत यांनी आपल्या एक्स (ट्वीटर)अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये एक व्यक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर फोटो काढताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत राऊत यांनी लिहिले की, “गृहमंत्री देवेंद्रजी यालाच म्हणतात गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य!”
गृहमंत्री देवेंद्र जी
यालाच म्हणतात गुंडांनी
गुंडा साठी चालविलेले राज्य!
नाशिक शहर परिसरात हत्या अपहरण दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला आदरणीय वेंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहे.
तुमचे मुख्यमंत्री देखील खुषीत आहेत!
हे असे असल्यावर दोन पायांची
कुत्र्याची पिल्ले… pic.twitter.com/C9Cl0Jg8Wk— Sanjay Raut (@rautsanjay61) February 10, 2024
पुढे त्यांनी लिहिले की, “नाशिक शहर परिसरात हत्या अपहरण दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला आदरणीय वेंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहे. तुमचे मुख्यमंत्री देखील खुशीत आहेत! हे असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच! हिंमत असेल तर मुख्यमंत्री त्यांचे बाळराजे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करा,” असे आव्हान संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.
हेही वाचा:
फडणवीसांच्या टिकेवर राऊतांचे प्रत्युत्तर
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांनी अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणामध्ये गृहमंत्र्यांचा राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर ‘श्वानाचे पिल्लू चाकाखाली मेले म्हणून विरोधक राजीनामा मागणार काय?’ असा सवाल फडणवीसांनी विचारला होता. यावर प्रत्युत्तर देत राऊत यांनी ‘ हे असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच,’ असं म्हटलं आहे. यावरून ‘सामना’ अग्रलेखामधूनही फडणवीसांवर टीका देखील करण्यात आली आहे.
मागील महिन्यात भरदिवसा पुण्यात शरद मोहोळची हत्या करण्यात आली. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटना घडली. तर दहिसरमध्ये शिववसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिसने गोळ्या घालून हत्या केली. यामुळे राज्यामध्ये सध्या कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात येत असून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.