Sangli-Satara MLC Election : सांगली-सातारा निवडणुकीत ‘हा’ जिल्हा ठरणार ‘किंगमेकर’; ४९ मतांचा गेमचेंजर फॉर्म्युला
Sangli-Satara MLC Election : केवळ विधान परिषदेपुरती मर्यादित नाही, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही होणार या हायव्होल्टेज लढतीचा थेट परिणाम.

Sangli-Satara MLC Election – विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपने सातारा जिल्ह्यातील धैर्यशील कदम यांची उमेदवारी जाहीर करून, राजकीय डाव टाकला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत मतदारसंख्येच्या दृष्टीने सातारा जिल्हा निर्णायक ठरत असल्याने, सर्व पक्षांच्या नेत्यांचे लक्ष सातार्याकडे लागले आहे.
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण 895 मतदार असून, त्यापैकी 472 मतदार सातारा जिल्ह्यात आणि 423 मतदार सांगली जिल्ह्यात आहेत. म्हणजे सातारा जिल्ह्यात तब्बल 49 मते जास्त आहेत. एकूण मतदारांपैकी 52 टक्क्यांहून अधिक मतदार असल्याने, सातारा जिल्हाच या निवडणुकीचा केंद्रबिंदू बनला आहे.
भाजपने धैर्यशील कदम यांची उमेदवारी जाहीर करून, महत्त्वाचा राजकीय डाव टाकला आहे. कदम यांनी सोमवारी सांगली येथे शक्तिप्रदर्शन करत, उमेदवारी अर्ज दाखल केला. कदम यांच्या उमेदवारीची चर्चा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत होती. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नाही, तरीही संयम राखलेल्या कदम यांना यावेळी पक्षाने संधी दिली आहे. त्यांची निष्ठा आणि संयमाचे हे फळ असल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे.
या मतदारसंघात उमेदवारीसाठी महायुतीकडून सातारा जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींना आपलेसे करण्याचा प्रयत्न यातून झाल्याचे दिसत आहे. सातार्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य असल्याने, मतांचे गणित सरळ नाही. त्यामुळे पक्षीय ताकदीबरोबरच उमेदवाराचा वैयक्तिक संपर्क आणि राजकीय स्वीकारार्हताही महत्त्वाची ठरणार आहे.
दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. त्यामुळे या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीने सक्षम उमेदवार मैदानात उतरवल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतांचे विभाजन आणि क्रॉस व्होटिंगची शक्यता असल्याचीही चर्चा आहे.
सातारा जिल्हा राज्याच्या राजकारणात प्रभावी मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाचा परिणाम केवळ विधान परिषदेपुरता मर्यादित न राहता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढील निवडणुका आणि जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाच्या ताकदीवरही होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरी राजकीय लढत सुरू होणार आहे. सातार्याच्या 472 मतांवर विजयाचे गणित फिरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत सातारा जिल्हा ‘किंग’ ठरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






