Sajjan Kumar Death : काॅंग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांच्या मृत्यूचे कारण काय?
Sajjan Kumar Death : काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे निधन झाले. 1984 शीखविरोधी दंगलीतील भूमिका, तिहार तुरुंग, जन्मठेपेची शिक्षा आणि न्यायालयीन कारवाई जाणून घ्या.

Sajjan Kumar Death : काँग्रेसचे माजी खासदार आणि 1984 च्या शीखविरोधी दंगलीतील दोषी सज्जन कुमार (वय 80) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.
सज्जन कुमार हे 1984 च्या दंगलीशी संबंधित प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. ते 31 डिसेंबर 2018 पासून तिहार तुरुंगात होते. एप्रिल 2026 मध्ये आजारी पत्नीला भेटण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे दिलासा मागितला होता; मात्र त्यांची जामीन याचिका फेटाळण्यात आली होती.
कोण होते सज्जन कुमार?
सज्जन कुमार यांचा जन्म 23 सप्टेंबर 1945 रोजी झाला. त्यांचे वडील रघुनाथ सिंह होते. त्यांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले होते. राजकारणात येण्यापूर्वी ते बेकरी चालवत होते. काँग्रेसचे दिवंगत नेते संजय गांधी यांचे ते निकटवर्तीय मानले जात.
Delhi: Family members of former Congress MP and 1984 anti-Sikh riots convict Sajjan Kumar, who died at the age of 80, arrive at Safdarjung Hospital. pic.twitter.com/zv8vlbpdMD
— IANS (@ians_india) August 20, 2026
1977 मध्ये दिल्ली महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव झाले. 1980 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर बाह्य दिल्ली मतदारसंघातून ते सातव्या लोकसभेवर निवडून आले. 1991 आणि 2004 मध्येही त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. 2004 मध्ये त्यांना 85 लाखांहून अधिक मते मिळाल्याचे सांगितले जाते.
1984 च्या दंगलीत काय घडले?
जून 1984 मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरात लष्कराने ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ केले. खलिस्तानी दहशतवादी जरनैल सिंह भिंडरावाले आणि त्याच्या साथीदारांविरोधातील या कारवाईमुळे शीख समाजातील मोठ्या वर्गात नाराजी निर्माण झाली.
Delhi: On the death of 1984 anti-Sikh riots convict Sajjan Kumar, Congress leader Pawan Khera says, “…Deepest condolences to his family…” pic.twitter.com/jPvygFyDJf
— IANS (@ians_india) August 20, 2026
त्यानंतर 31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या दोन शीख अंगरक्षकांनी हत्या केली. त्यानंतर देशभरात शीखविरोधी दंगली उसळल्या. या हिंसाचारात देशभरात तीन ते पाच हजार लोकांचा मृत्यू झाल्याचे विविध अंदाज आहेत. दिल्लीमध्ये दोन हजारांहून अधिक लोक मारले गेल्याचे सांगितले जाते.
सज्जन कुमार यांच्यावर काय आरोप होते?
दिल्लीतील सुल्तानपुरी, दिल्ली कॅन्ट आणि पालम कॉलनी परिसरातील हिंसाचारात सज्जन कुमार यांच्यावर जमावाला भडकवल्याचे आरोप झाले. पीडितांच्या साक्षीनुसार त्यांनी जमावाला हिंसाचारासाठी प्रवृत्त केले होते. त्यांच्या समर्थकांनी मतदार यादीच्या माध्यमातून शीख कुटुंबांची घरे आणि दुकाने ओळखून त्यांच्यावर हल्ले, तोडफोड आणि जाळपोळ केल्याचे आरोपही झाले.
दिल्ली कॅन्टच्या राजनगर परिसरात पाच शीख—केहर सिंह, गुरप्रीत सिंह, रघुवेंद्र सिंह, नरेंद्र पाल सिंह आणि कुलदीप सिंह—यांची हत्या झालेल्या प्रकरणातही त्यांचे नाव आले.
PUDR आणि PUCL यांच्या तथ्यशोधन अहवालांमध्येही सज्जन कुमार यांच्यावरील आरोपांचा उल्लेख करण्यात आला होता. अनेक पीडितांनी काँग्रेसच्या एका खासदारावर जमावाला भडकवल्याचा आरोप केला आणि नंतर त्याची ओळख सज्जन कुमार म्हणून केली.
कायदेशीर कारवाई कशी झाली?
2002 मध्ये दंगलीशी संबंधित एका प्रकरणात दिल्लीच्या कनिष्ठ न्यायालयाने सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता केली. 2005 मध्ये नानावटी आयोगाच्या अहवालाच्या आधारे सीबीआयने त्यांच्याविरोधात नवीन गुन्हा दाखल केला. 2010 मध्ये कडकडडुमा न्यायालयात सुनावणी सुरू झाली. बलवान खोखर, महेंद्र यादव, महा सिंह यांच्यासह इतरांनाही आरोपी करण्यात आले.
2013 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने सज्जन कुमार यांची पुन्हा निर्दोष मुक्तता केली. मात्र, प्रकरणातील अन्य पाच आरोपी दोषी ठरले.
यानंतर पीडित आणि साक्षीदारांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. जगदीश कौर यांनी पती आणि मुलासह पाच शीखांच्या हत्येप्रकरणी सज्जन कुमार यांच्याविरोधात साक्ष दिली. निरप्रीत कौर आणि चमकौर यांच्यासह इतर साक्षीदारांनीही त्यांच्यावर गंभीर आरोप केले.
दोन प्रकरणांत जन्मठेप –
दिल्ली कॅन्ट प्रकरण : 17 डिसेंबर 2018 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने पाच शीखांच्या हत्येशी संबंधित प्रकरणात सज्जन कुमार यांना दोषी ठरवून जन्मठेप सुनावली. त्यानंतर त्यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले.
सरस्वती विहार प्रकरण : फेब्रुवारी 2025 मध्ये राऊज अव्हेन्यू न्यायालयाने 1 नोव्हेंबर 1984 रोजी जसवंत सिंह आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंह यांच्या हत्येप्रकरणी सज्जन कुमार यांना दुसऱ्यांदा जन्मठेप सुनावली. अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार, जमावाला भडकवल्यानंतर शीखांच्या घरांवर व दुकानांवर लूट आणि जाळपोळ झाली. या प्रकरणात विशेष तपास पथकाने जसवंत सिंह यांच्या पत्नीची प्रत्यक्षदर्शी साक्ष घेतली होती.
2014 मध्ये केंद्र सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने 1984 च्या दंगलीतील प्रलंबित प्रकरणांची पुन्हा चौकशी सुरू केली. त्यानंतर सज्जन कुमार यांच्याविरोधातील कायदेशीर कारवाईलाही वेग आला.
सज्जन कुमार यांच्या निधनाने 1984 च्या शीखविरोधी दंगलीतील एका प्रमुख आरोपीच्या दीर्घ न्यायालयीन प्रवासाचा शेवट झाला आहे. त्यांच्या निधनाचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही.





