Saif Ali Khan: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. ‘ओमकारा’, ‘एलओसी कारगिल’ यांसारख्या चित्रपटांनंतर ‘टशन’च्या शूटिंगदरम्यान त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात झाली. २०१२ साली या दोघांनी लग्न केलं. आता सैफने त्यांच्या नात्याबद्दल एक प्रामाणिक प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच ‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला की, लग्नानंतर करीना इतर अभिनेत्यांसोबत काम करत असताना त्याला थोडा हेवा वाटायचा. “ती इतर पुरुष कलाकारांसोबत काम करताना मला कसं वागायचं, हे कळत नव्हतं. माझ्यासाठी तो अनुभव नवीन होता. नातं नवीन असताना आणि स्वभावाने थोडा जास्त काळजी करणारा असाल, तर अशा भावना हाताळणं अवघड जातं,” असं सैफने सांगितलं. तो पुढे म्हणाला, “याआधी मी ज्या मुलींना भेटलो होतो, त्यांचा चित्रपटसृष्टीशी काही संबंध नव्हता. त्यामुळे हे सगळं माझ्यासाठी वेगळं होतं. एकदा असं वाटलं की, जे माझे प्रतिस्पर्धी आहेत, तेच तिचे सहकारी आहेत. पण हळूहळू हे सगळं समजून घेतलं आणि स्वीकारलं. शेवटी प्रेम सगळ्यावर मात करतं.” सैफने हेही स्पष्ट केलं की, तो करीनाच्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी मनापासून शुभेच्छा द्यायचा. “तिला यश मिळावं, तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा, हेच मला महत्त्वाचं वाटायचं. जरी त्यासाठी मला माझ्या स्पर्धकांना पाठिंबा द्यावा लागला तरी,” असं तो म्हणाला. शेवटी सैफ म्हणाला की, काळानुसार त्याचा विचार बदलत गेला आणि अधिक प्रगल्भ झाला. “या इंडस्ट्रीत सगळ्यांसाठी संधी आहेत. सुरुवातीला सगळं नवीन होतं, तेव्हा करीनानेच मला समजावून सांगितलं,” असंही त्याने नमूद केलं.