साहित्य संमेलन : सत्ताधारी वर्गाला खूश करण्यासाठी साहित्यात चीअरलीडर्स तयार होणे दुर्दैवी – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो

उदगीर – तीन महिन्यांत संमेलनाचे आव्हान पेलणे, खरचं कौतुकास्पद आहे. मी गोव्यातून आलो आहे. उदगीरबद्दल माहीत नव्हते. काहींनी येथे उन्हाळा कडक असल्याचे सांगितले. मात्र येथील प्रेमाने उन्हाळा जाणवलाच नाही, कोकणी-मराठी नाते 600- 700 वर्षांचे आहे.
संत नामदेव यांनी पंजाबी, उर्दू, कोकणी, मराठी, गुजराती अशा सर्व भाषात रचना केल्या. तेच कोकणी भाषेचे पहिले कवी असून, 14 व्या शतकात त्यांनी कोकणीत गौळण प्रकारात रचना केल्या आहेत. इतर भाषांतील शब्द संपदा स्वीकारल्यानेच मराठी समृद्ध झाली आहे. आज मराठी सर्वाधिक संपन्न भाषा असून, इतर बोलींचा आनंद घेतला पाहिजे, असे मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यांनी व्यक्त केले.
चिरंतनाला धक्के देणारे साहित्य कालानुरूप असते. आवडत नसलेले साहित्य जाळणे, बंदी घालणे योग्य नव्हे. सत्तेला माज चढतो, तेव्हा साहित्यावर निर्बंध लादले जातात. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले पाहिजे. इंदिरा गांधी यांच्या काळात आणीबाणीला साहित्यिकांनी प्रखर विरोध केला. आज साहित्यात सत्ताधाऱ्यांना चिअर्स करणारे चिअर्स लिडर्स तयार झाले आहेत, हे दुर्दैव आहे.
किंबहुना, लेखक हा असा असू नये. तो बंडखोरच असला पाहिजे, असे ते म्हणाले. मला वाद नव्हे; संवाद आवडतो. मी कोकणी भाषक, कोकणीत लिहितो. मराठी लेखक आणि आपल्यात कधीच भाषावाद आला नाही. कोकणी व मराठीत द्वेष नको, वाद नको. पुढचे संमेलन गोव्यात घेवून सर्व वाद हे संवादातूनच मिटतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





