Delhi : साहित्य संमेलनात देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद; मराठवाडा साहित्य परिषदेने मांडलेल्या ठरावावरून खडाजंगी

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मोठ्या थाटात सुरूवात झाली. संमेलनाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. तर स्वागताध्यक्ष देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार आहेत. संमेलनासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थित लाभली होती. डॅा. तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. आता संमेलनात मराठवाड्यातील देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू यावरून खडाजंगी झाल्याची माहिती मिळत आहे.
संमेलनात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेले भष्ट्राचाराचे आरोप अशा काही प्रश्नांना घेऊन त्याचे पडसाद अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनात पाहायला मिळाले. मराठवाडा साहित्य परिषदेने यासंदर्भात मांडलेल्या ठरावावरून साहित्य महामंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाली. यामुळे महामंडळ हा ठराव स्विकारून समारोपावेळी मांडणार का, हे आज म्हणजेच रविवारी स्पष्ट होणार आहे.
मराठवाड्याला गुंडगिरीचे ग्रहण
या बैठकीत मराठवाडा साहित्य परिषदेने सध्या राज्यभर गाजत असलेल्या मराठवाड्याच्या प्रश्नासंबंधीचा ठराला मांडला. या ठरावामध्ये परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, मंत्र्यावर होत असलेले भष्ट्राचाराचे आरोप यामुळे मराठवाड्याला ग्रहण लागण्याची खंत व्यक्त करण्यात आली.
या प्रकरणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी स्वपक्षीय राजकारणाचा विचार न करता ही गुंडगिरी संपवण्याची हमी देण्याची मागणी हे संमेलन करत असल्याचे ठरावात म्हटले आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणारा ठरावही मांडण्याचा प्रस्वात ठेवण्यात आला आहे.





