Ramesh Slams India : ‘आयर्लंडला हलक्यात घेणं भारताला महागात पडलं…’, लाजिरवाण्या पराभवानंतर माजी खेळाडूने ओढले ताशेरे
Ramesh Slams India : या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचा माजी सलामीवीर फलंदाज सदागोपान रमेश याने भारतीय संघाच्या खराब कामगिरीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

Sadagopan Ramesh Criticizes India Loss against Ireland : आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात मिळालेल्या ऐतिहासिक आणि मानहानीकारक पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघावर चहुबाजूंनी टीका होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडने भारताला पहिल्यांदाच धूळ चारल्यामुळे क्रीडा वर्तुळात खळबळ उडाली आहे. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचा माजी सलामीवीर फलंदाज सदागोपान रमेश याने भारतीय संघाच्या खराब कामगिरीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. “भारतीय खेळाडू आयर्लंड दौऱ्याला केवळ एक पिकनिक समजत होते,” अशा कडक शब्दांत रमेशने टीम इंडियाला सुनावले आहे.
“इंग्लंड मेन कोर्स, तर आयर्लंड म्हणजे लोणचं होतं, पण…” –
सदागोपान रमेशने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना भारतीय संघाच्या अतिआत्मविश्वासाचा समाचार घेतला. तो म्हणाला, “आयर्लंडचे कौतुक केले पाहिजे की त्यांनी मोठ्या सीमांचा वापर केला आणि शॉर्ट बॉल्स टाकून भारतीय फलंदाजांची खरी परीक्षा घेतली. हे स्पष्ट दिसत होते की भारताने या सामन्याला खूप हलक्यात घेतले. त्यांना वाटले की आयर्लंड मालिका म्हणजे एक पिकनिक टूर आहे, जी ते सहज जिंकतील. त्यांची संपूर्ण गंभीरता फक्त आगामी इंग्लंड मालिकेसाठी होती. पण आयर्लंडने भारताला कडक धडा शिकवला आहे की ही कोणतीही पिकनिक नाही.”
तो पुढे म्हणाला, “आयर्लंड मालिका सुरुवातीला नियोजित नव्हती. हा दौरा म्हणजे इंग्लंडच्या ‘मेन कोर्स’सोबत मिळालेल्या ‘लोणच्या’सारखा होता. पण अत्यंत शरमेची गोष्ट म्हणजे भारत या लोणच्याचा तिखटपणाही सहन करू शकला नाही. अतिआत्मविश्वास कधीही चांगला नसतो आणि त्याचमुळे भारताचा खेळ काल रात्री संपला.”
History as Ireland defeats India for the first time in men’s international cricket following a 34-run victory in the opening T20I in Belfast 🍀✨
More 📲 https://t.co/kDfBk3fP92 pic.twitter.com/lqPZIWSfpY
— ICC (@ICC) June 27, 2026
चार महिने टी-२० खेळूनही पराभव; हे अनाकलनीय!
रमेशने खेळाडूंच्या सातत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, “कधीकधी हत्तीही घसरतो हे मान्य आहे, पण ते आयर्लंडविरुद्ध कसे काय होऊ शकते? विशेषतः अशा संघासोबत, ज्याने आपला शेवटचा टी-२० सामना थेट विश्वचषकाचा फायनल खेळला होता. विश्वचषकानंतर सर्व खेळाडूंनी ३ महिने आयपीएल खेळले. सलग चार महिने टी-२० क्रिकेट खेळल्यानंतरही आयर्लंडकडून पराभूत होणे हे पूर्णपणे अनाकलनीय आणि डोक्याबाहेरचे आहे.”
या पराभवाने नवा कर्णधार श्रेयस अय्यर आणि त्याच्या संघावर प्रचंड दबाव आणला आहे. १८३ धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्माच्या २० चेंडूंतील ४९ धावांच्या तुफानी खेळीनंतरही संजू सॅमसन, इशान किशन आणि तिलक वर्मा यांसारखे स्टार फलंदाज अपयशी ठरल्याने भारताचा डाव १४८ धावांवरच आटोपला.





