Rajesh Sawant passed away : दु:खद बातमी! हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाचे निधन
Rajesh Sawant passed away : त्यांच्या आकस्मिक जाण्याने रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात हळहळ व्यक्त होत आहे.

Rajesh Sawant passed away : रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत (Former District President Rajesh Sawant) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश सावंत हे कोल्हापूरहून रत्नागिरीकडे परतत असताना प्रवासादरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना पाली येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबीय, मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.
राजेश सावंत यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमधून केली होती. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केला. पुढे भारतीय जनता पक्षात दाखल होत त्यांनी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी असलेला जवळचा संवाद आणि संयमी नेतृत्वशैलीमुळे त्यांनी राजकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती.
काही काळापासून ते सक्रिय राजकारणापासून दूर असले तरी सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग कायम होता. राजकारणासोबतच ते उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणूनही परिचित होते. क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचीही अनेकांकडून आठवण काढली जात आहे.
राजेश सावंत यांच्या निधनामुळे रत्नागिरी जिल्ह्याने एक लोकप्रिय, मनमिळावू आणि सर्वपक्षीय मैत्री जपणारे नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Dipika Kakar: एअर होस्टेस ते टीव्हीची सुपरहिट सून! दीपिका कक्करचा थक्क करणारा प्रवास





