Sachin Tendulkar Statement : “त्याच्या डोक्यात आतापासूनच…”; वैभव सूर्यवंशीबाबत सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य, पाहा VIDEO
Sachin Tendulkar Statement : आयपीएल २०२६ नंतर, वैभव सूर्यवंशीचा पुढचा मोठा दौरा जून २०२६ मध्ये होणारा श्रीलंका दौरा असेल. इंडिया 'अ' संघाकडून त्रिकोणीय मालिकेत खेळलेल्या वैभवला भारतीय संघात स्थान मिळवण्याची सुवर्णसंधी मिळेल.

Sachin Tendulkar statement on Vaibhav Sooryavanshi : वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी आपल्या स्फोटक फलंदाजीने आयपीएल आणि क्रिकेट जगतात खळबळ माजवणारा वंडर बॉय वैभव सूर्यवंशी सध्या चांगलाच चर्चेत आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने अनेक मोठे विक्रम मोडले आहेत. त्याची ही तुफानी कामगिरी पाहून त्याला तात्काळ भारतीय संघात समाविष्ट करावे, अशी मागणी चाहत्यांकडून आणि समीक्षकांकडून सातत्याने होत आहे. या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आता खुद्द ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरने आपली सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे, ज्याची सध्या क्रीडा वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
वैभव आता जसा खेळत आहे, तसाच तो राहणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट –
वैभवच्या नैसर्गिक खेळाचे कौतुक करताना सचिन तेंडुलकर म्हणाला, “वैभव आता जसा खेळत आहे, तसाच तो राहणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मी त्याला हाच सल्ला देईन की त्याने स्वतःमध्ये बदल करू नये. प्रत्येक गोष्टीची एक पहिली वेळ असते. जसजसे त्याचे वय वाढेल आणि त्याला कसोटी क्रिकेटचा अनुभव मिळेल, तसतसा तो वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जायला स्वतःहून शिकेल. वैभव सूर्यवंशी हा एक नैसर्गिक खेळाडू आहे, जो स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवतो आणि मैदानावर त्याला नेमके काय करायचे आहे, याची त्याला पक्की माहिती असते.”
“त्याच्या डोक्यात आतापासूनच खूप गोष्टी घालू नका!”
#VaibhavSooryavanshi has captured the imagination of cricket fans everywhere, but what does #SachinTendulkar make of his performances? 🤔
Watch #CricinfoHonours 👉 Star Sports, JioHotstar & Cricinfo! pic.twitter.com/YroxjGBdrp
— Star Sports (@StarSportsIndia) May 30, 2026
सचिनने पुढे सावधगिरीचा इशारा देत म्हटले, “मला त्याच्या नैसर्गिक खेळण्याच्या प्रवृत्तीत अजिबात हस्तक्षेप करायचा नाही. ज्या पद्धतीने तो चेंडूचा टप्पा ओळखतो आणि त्यावर फटकेबाजी करतो, ते खरोखरच अद्भूत आहे. जर आपण आतापासूनच त्याच्या डोक्यात खूप गोष्टी घातल्या आणि त्याला सतत वेगवेगळ्या सूचना दिल्या, तर खरी समस्या तिथूनच सुरू होईल. त्याच्याकडे चेंडू जोरात मारण्याची ताकद तर आहेच, पण मनगटाच्या कौशल्याने चेंडूला दिशा देण्याचे कसबही त्याच्याकडे अप्रतिम आहे.”
अजित आगरकर समोर असताना टीम इंडियातील निवडीवर सचिन काय म्हणाला?
वैभवला भारतीय संघात खेळवण्याबाबत विचारले असता सचिनने अतिशय परिपक्व उत्तर दिले. तो म्हणाला, “मी निवड समितीचा सदस्य नाही. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर समोर बसलेला असताना मी वैभवच्या टीम इंडियातील समावेशावर थेट बोलणे योग्य ठरणार नाही. पण केवळ मलाच नाही, तर भारतातील प्रत्येक क्रिकेट चाहत्याला त्याला कोणत्या ना कोणत्या स्तरावर भारतासाठी खेळताना पाहायचे आहे. अशा अद्वितीय प्रतिभेला नेहमी पाठिंबा आणि योग्य प्रोत्साहन मिळायलाच हवे. सध्यातरी आपण सर्वांनी त्याच्यावर कोणताही दबाव न टाकता, तो खेळत असलेल्या क्रिकेटचा आनंद घेतला पाहिजे.”





