S. Jaishankar : भारत भूटानच्या प्रगतीसाठी कटिबद्ध; एस. जयशंकर यांनी केले स्पष्ट
भारत भूतानच्या प्रगती आणि समृद्धीसाठी दृढपणे कटिबद्ध आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी गुरुवारी थिम्पू येथे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे यांची भेट घेतल्यानंतर सांगितले.

S. Jaishankar : भारत भूतानच्या प्रगती आणि समृद्धीसाठी दृढपणे कटिबद्ध आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी गुरुवारी थिम्पू येथे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे यांची भेट घेतल्यानंतर सांगितले. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणि सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने जयशंकर बुधवारी दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर भूतानमध्ये दाखल झाले.
भेटीनंतर जयशंकर (S. Jaishankar) यांनी सोशल मिडियावर आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आज थिम्पूमध्ये भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे यांची भेट घेऊन आनंद झाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिवादन पोहोचवले. आमच्या मैत्री आणि सहकार्याच्या अद्वितीय संबंधांबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा मी खूप आदर करतो.
भारत भूतानच्या प्रगती आणि समृद्धीसाठी दृढपणे कटिबद्ध असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या प्रसंगी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी भूतानचे पंतप्रधान तोबगे यांच्याकडे ५४ ‘मेड इन इंडिया’ इलेक्ट्रिक वाहने सुपूर्द केली. ई-मोबिलिटी आणि शाश्वत वाहतुकीच्या दिशेने भूतानच्या प्रगतीला भारत पाठिंबा देत आहे, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पारो या खोऱ्यातील शहरात आगमन झाल्यावर जयशंकर यांचे भूतानी समकक्ष डी. एन. धुंग्येल यांनी हार्दिक स्वागत केले. दोन्ही मंत्र्यांमधील चर्चेत विकास भागीदारी, ऊर्जा, व्यापार, कनेक्टिव्हिटी, संस्कृती आणि लोकांमधील संबंध या क्षेत्रांमध्ये बहुआयामी सहभाग वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
परराष्ट्र मंत्र्यांनी (S. Jaishankar) मोंगार येथील ६५ खाटांच्या ग्याल्त्सुएन जेट्सुन पेमा माता आणि बाल रुग्णालयासह काही प्रकल्पांचे उद्घाटनही केले. त्यांनी उत्तर भूतानमधील गासा येथे ५०० किलोवॅट क्षमतेच्या लुनाना जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणीही केली.






