बीसीसीआयने गेल्या काही काळापासून असे काही निर्णय घेतले आहेत की त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचेच दाखले मिळत आहेत. गेल्या मौसमात थोडेथोडके नव्हे तर सहा कर्णधार बदलून झाले. आता तर असेच वाटू लागले आहे की ऋतू बदलतो तशा मालिका बदलल्या की कर्णधारही बदलला जात आहे. मग ही बीसीसीआयची सीझनल आवड म्हणायची का?
महेंद्रसिंह धोनीने नेतृत्व सोडल्यावर विराट कोहलीला ही जबाबदारी दिली गेली. त्याचे मीठ आळणी ठरल्यावर रोहित शर्मावर मर्जी बसली. मधल्या काही मालिकांत रोहितने विश्रांती मागितल्यावर पगारी रजा दिल्यासारखी त्याला विश्रांती दिली गेली व लोकेश राहुलला नेतृत्व सोपवले.
मध्ये काही सामन्यांसाठी ऋषभ पंतचाही कर्णधारपदावर उपयोग केला गेला. आता रोहितच्या विश्रांतीच्या कालावधीत हार्दिक पंड्याकडे नेतृत्व दिले मात्र, एकदिवसीय सामन्यांसाठी शिखर धवनच्या डोक्यावर का काटेरी मुकूट बसवला गेला. काय चालले आहे ते बीसीसीआयला तरी झेपत आहे का, असा प्रस्न पडतो.
गांगुली आला व कोहली गेला
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री आले तेव्हापासून कोहलीची व त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली होती. मात्र, सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष झाला व मिठाचा खडा पडला. मुळातच शास्त्री व गांगुली यांच्यातून विस्तव जात नव्हता. त्यामुळे कोहलीची शास्त्रींशी वाढत चाललेली जवळीक त्याला खूपत होती. काट्याने काटा काढला जातो या तत्त्वानुसार गांगुलीने चाली खेळल्या. शास्त्रींची मुदत संपल्यावर खुद्द त्यांनीच ती वाढवण्यास नकार दिला कारण त्यांना चांगलेच माहिती होते की गांगुली त्यांना कोणत्या तरी वादात ओढेल. गांगुलीला खरेतर शास्त्रींसी काहीही देणेघेणे नव्हेत त्याला केवळ कोहलीने त्यांच्यापासून अंतर ठेवावे हीच इच्छा होती. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसारखा आयकॉन बनत चाललेला कोहली ते मान्य करायलाच तयार नव्हता. शास्त्री-कोहली युतीच्या काळात संघ सातत्याने मालिका जिंकत होता.
कसोटी क्रमवारीतही संघ पहिल्यांदाच अव्वलस्थानी आला होता. केवळ आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा या युतीला जिंकता आल्या नव्हत्या व नेमके त्याच गोष्टींचे भांडवल गांगुलीने केले. त्याने आधी मीडिया ट्रायल करत कोहली व शास्त्रींवर दडपण आणले व त्यातच कोहलीकडून टी-20 संघाचे कर्णधारपद काढून घेण्याची चाल खेळली. कोहलीसारख्या तशा तापट पण प्रचंड स्वाभिमानी खेळाडूला हा अपमान सहन झाला नाही व त्याने सर्व संघांचे नेतृत्व सोडले. मला नेतृत्वावरून दूर करण्यात येण्यापूर्वी गांगुलीसह बीसीसीआयच्या कोणत्याही सदस्याने तसेच निवड समितीने माझ्याशी साधा संवादही साधला नाही हे कोहली म्हणतो तेव्हा त्याचे गांभीर्य चटकन लक्षात येते. हे म्हणजे आमचे ऐकले नाहीस ना मग बघ काय होते ते, असेच कोहलीला संकेत देत सांगितले गेले.
द्रविडची मैत्री निर्णायक ठरली
जेव्हापासून माजी कर्णधार राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) संचालक बनला तेव्हापासून त्यालाच भारताच्या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद द्यायचे हे गांगुलीने आधापासूनच ठरवल्यासारख्या घटना घडल्या. शास्त्रींचा करार संपल्यावर लगेचच द्रविडचे मन वळवून त्याच्याकडे ही नवी जबाबदारी दिली. अर्थात गांगुलीने द्रविडला सातत्याने झुकते माप दिल्याचे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. जेव्हा एकदिवसीय संघात द्रविडच्या स्थानावरून चर्चा सुरू झाल्या होत्या त्यावेळी आपल्या या मित्राला संघातील स्थान गमवावे लागू नये यासाठी गांगुलीने द्रविडला यष्टीमागे उभे केले व त्याचे स्थान टिकवले. एनसीएच्या संचालकपदी व्हीव्हीएस लक्ष्मण याला नेमायचे व द्रविडला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करायचा विचार तेव्हापासूनच सुरू झाला होता. द्रविड खरेतर या पदाची जबाबदारी घेण्यासाठी तयार नव्हता मात्र, आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचा मेंटॉर झाल्यानंतर त्याच्यावर गांगुलीने दबाव टाकला व अखेर मैत्रीला जागत द्रविडने मंजुरी दिली. मात्र, आता द्रविड तरी किती दिवस टिकेल याची शाश्वती कोणी देणार नाही.
गांगुलीचेच संस्थान खालसा
बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर गांगुली आला व तेव्हापासून भारतीय क्रिकेटला नवी उंची व दिशा मिळेल असा विश्वास मिळाला होता. कारण एक खेळाडू व माजी कर्णधार असलेला गांगुली व्यवस्थापनातील दोष दूर करत पारदर्शकता आणेल व पुरूष क्रिकेटपटूंसह महिला क्रिकेटपटूंनाही त्या सगळ्या सुविधा देईल व महिलांची परिपूर्ण आयपीएल स्पर्धाही सुरू होईल याचेही संकेत तेव्हाच मिळाले होते. मात्र, असे काहीही घडले नाही. त्याने केवळ आश्वासनेच दिली प्रत्यक्षात काहीही केले नाही. त्यातच पश्चिम बंगालमधील राजकारणात गांगुलीला मोठे करत ममता बॅनर्जींचे महत्त्व कमी करण्याची चाल भारतीय जनता पक्षाने रचली होती. त्याचसाठी गृहमंत्री अमित शहा यांनी गागुंलीच्या घरी डिप्लोमॅटिक डिनरही घेतले होते. तेव्हाच गांगुलीला म्हणे पक्षात येण्याचा प्रस्ताव दिला गेला होता. मात्र, ममतांशी कौटुंबिक संबंध असलेल्या गांगुलीने हा प्रस्ताव नाकारला व तेथूनच गांगुलीचे दिवस फिरले. त्याला बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची दुसरी टर्म नाकारली गेली. इतकेच नव्हे तर त्याला आयसीसीच्या अध्यक्षपदासाठीही नामांकन दिले गेले नाही. मुदत संपल्यावर गांगुलीचे बीसीसीआयमधील अस्तित्वही संपवले गेले. भारतीय क्रिकेटमध्ये जेव्हा 1999-2000 साली मॅच फिक्सिंग घडले होते त्या काळात गागुंलीने कर्णधारपद स्वीकारून बदल नव्हे तर क्रांती घडवली. त्याने युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देत आपल्या आक्रमक नेतृत्वातून भारतीय क्रिकेटची बदनामी तर थांबवलीच; पण संघाला नवी उंचीही मिळवून दिली. ज्या पाकिस्तान व ऑस्ट्रेलियासमोर आपण नांगी टाकत होतो तिथे आपले डोळे वटारायची सवय जडली. या दोन संघांना आपल्या संघाने सातत्याने पाणी पाजले व जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघ म्हणजे बीसीसीआय महासत्ता बनली. हे श्रेय गांगुलीचेच आहे हे कोणी नाकारणार नाही. मात्र, ज्याने भारतीय संघाला व बीसीसीआयला नवी ओळख मिळवून दिली त्याचेच संस्थान खालसा झाले.
मालिकांनुसार कर्णधार
बीसीसीआयने गांगुलीच्या निवृत्तीनंतर द्रविड, अनिल कुंबळे असे अनेक पर्याय वापरले; पण धोनीने जे नेतृत्व केले त्याची सर यातील कोणाच्याही कामगिरी नव्हती. द्रविडनेही एनसीमध्येच रमण्याचे निश्चित केले होते व युवा खेळाडू तयार करत भारतीय संघाला सेकंड बेंच देण्याचे कार्य हाती घेतले होते. त्याला त्याने चांगला न्यायही दिला मात्र, तोच जेव्हा मुख्य प्रशिक्षक बनला तेव्हा त्याने पहिले पाढे पंचावन्न हेच सूत्र पाळले. कोहलीला कर्णधारपदावरून दूर केल्यावर रोहितकडे हा भार दिला गेला. मध्येच त्याच्या जागी राहुल, पंत, धवन, हार्दिक पंड्या व जसप्रीत बुमराह असे अनेक खेळाडू कर्णधार म्हणून काही मालिकांत खेळले. निवड समितीच्या अध्यक्षपदी चेतन शर्मा आले व त्यांचा हा कर्णधार-कर्णधार खेळ सुरू झाला. त्यांचे त्यांनाच समजत नव्हते की ते काय निर्णय घेत आहेत.
आता यंदा ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागल्यावर लगेचच रोहित हटाओ मोहीम सुरू झाली. त्यातच रोहितसह प्रमुख खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 व एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून विश्रांती दिली गेली. पंड्याला टी-20 साठी तर धवनला एकदिवसीय सामन्यांसाठी नेतृत्व दिले गेले. मुळात रोहितने आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सला सातत्याने विजेतेपद मिळवून दिले म्हणून तो भारतीय संघाचे नेतृत्वही त्याच यशस्वीपणे करेल हा फाजील आत्मविश्वास होता. आयपीएलमधील क्रिकेट व आंतरराष्ट्रीय क्रिकेट यात मोठा फरक असतो हे बीसीसीआयच्या व निवड समितीच्या लगेचच लक्षात आले. मालिकांनुसार नेतृत्व बदलाची ही खोड भारतीय क्रिकेटमधून ज्या दिवशी जाईल त्याच दिवशी भारतीय क्रिकेटमध्ये बदल व परिवर्तन घडेल.
रोगापेक्षा इलाज भयंकर
गांगुलीची मुदत संपल्यावर माजी कसोटी क्रिकेटपटू व 1983 सालच्या विश्वकरंडक विजेत्या भारतीय संघाचे खेळाडू रॉजर बिन्नी यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान केले गेले. मात्र, त्यांनीही अनाकलनीय निर्णय घेत टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील अपयशी कामगिरीचे खापर निवड समितीवर फोडून चेतन शर्मा यांच्यासह सगळ्या निवड समितीलाच बरखास्त केले. याला रोगापेक्षा इलाज भयंकर म्हणायचे का? संघ निवड करणे व उपलब्ध खेळाडूंमधून सर्वोत्तम संघ कर्णधाराच्या हाती सोपवणे इतकेच काम त्यांचे असते. पण मैदानावर खेळाडूंनीच कामगिरी सिद्ध करायची असते हेच बीसीसीआय विसरले. त्यांनी शर्मांची समिती हटवली व नव्याने अर्ज मागवले आहेत. आता या पदांवर कोणती व्यक्ती येते व त्याचे पुढे काय होते हा भाग अलाहिदा. निदान पुढील दोन ते तीन वर्षांचा काळ लक्षात घेत तसेच आगामी विश्वकरंडक तसेच अन्य मालिका डोळ्यांसमोर ठेवत असा कर्णधार निवडला पाहिजे की तो धोनी किंवा गांगुलीप्रमाणे दीर्घकाळ संघाचे यशस्वी नेतृत्व करेल. सीझनल फळांसारखी कर्णधारांची निवडही सीझनल होऊ नये.