“गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने ब्लड प्रेशर कंट्रोल होऊ शकतो तर कॅन्सर…”; उत्तर प्रदेशच्या मंत्र्याचे अजब विधान

Uttar Pradesh News | उत्तर प्रदेशचे मंत्री संजय सिंह गंगवार यांनी गाईच्या गोठ्यात झोपल्याने आणि गोठ्याची स्वच्छता केल्याने कॅन्सर बरा होऊ शकतो, असे अजब विधान केले आहे. इतकेच काय तर गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने ब्लड प्रेशर कंट्रोल होऊ शकतो, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. तसेच त्यांच्यावर टीका देखील केली जात आहे.
पिलीभीतच्या नौगावा पाकडिया नगर पंचायतमध्ये 55 लाख रुपये खर्च करून कान्हा गोशाळा बांधण्यात आली आहे. राज्यमंत्री संजय सिंह गंगवार रविवारी या गोआश्रमाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना गंगवार म्हणाले, “गाईच्या पाठीवर 10 दिवस सकाळ-संध्याकाळ हात फिरवायला पाहिजे आणि त्यांची सेवा केली पाहिजे. ज्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो. जर व्यक्ती औषधाचा २० मिलीग्राम डोस घेत असेल तर १० दिवसांत १० मिलीग्रामने ते कमी होईल. हे मी ठामपणे सांगू शकतो.”
पुढे ते म्हणाले, “जर कॅन्सरच्या रुग्णाने गोठ्याची साफसफाई केली आणि त्याने गोठ्यात झोपायला सुरुवात केली तर कॅन्सरही बरा होतो. शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या जाळल्यास डासांचा त्रास कमी होतो. गायीपासून मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा काही ना काही प्रकारे उपयोग होत असतो.”
तर मुस्लिम बांधवांना ईदच्या दिवशी गोशाळेत येण्याचं आवाहन करून त्यांनी सांगितलं की, “ईदला तयार होणाऱ्या शेवया गायीच्या दुधापासूनच बनवाव्यात. कारण गाईचे दूध हे अमृतसारखे असते.”
संजय सिंह गंगवार यांनी केले आवाहन
लोकांना गोशाळेशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. निराधार गायींना संरक्षण देणे हे आमचे सरकारचे प्राधान्य आहे, त्यासाठी आम्ही ग्रामपंचायत आणि नगर पंचायत स्तरावर गोशाळे बांधत आहोत. त्यामुळेच लोकांनी आपल्या लग्नाचे वाढदिवस, त्यांच्या मुलांचे वाढदिवस गायींसोबत साजरे करण्याची आणि गोशाळांना चारा दान करण्याचे आवाहन मंत्र्यांनी केले आहे.
हेही वाचा :
विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग; दिल्लीत आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक





