Rohit Pawar : महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) सातत्याने धक्कादायक खुलासे करत असल्याने त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचा गंभीर दावा पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार (Rohit Pawar) यांना तात्काळ ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरवावी, अशी मागणी सुनील माने यांनी केली आहे. दबाव टाकला जात आहे” माध्यमांशी बोलताना सुनील माने यांनी सांगितले, “अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवारांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत, त्यातून अनेक धक्कादायक आणि गंभीर गोष्टी समोर येत आहेत. ही माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू नये, असे काही शक्तिशाली घटकांना वाटत आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, अशा घटकांकडून रोहित पवार यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.” व्यावसायिक हितसंबंध आणि विमान कंपनीचा संशय सुनील माने यांनी या प्रकरणात फक्त राजकीय नव्हे, तर व्यावसायिक हितसंबंधांचाही मोठा वाटा असल्याचा संशय व्यक्त केला. विशेषतः अपघातग्रस्त विमान कंपनी VSR वेंचर्स आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या मोठ्या आर्थिक हितसंबंधांमुळे रोहित पवार यांना लक्ष्य केले जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले. “हा केवळ राजकीय मुद्दा राहिलेला नाही. यात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आणि आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे काही लोक अस्वस्थ झाले आहेत,” असे माने यांनी नमूद केले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना निवेदन देणार रोहित पवार यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री यांची भेट घेणार आहेत. या भेटीत रोहित पवार यांना तातडीने ‘झेड प्लस’ सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे. सुनील माने यांनी स्पष्ट केले की, “ही मागणी केवळ पक्षाची नाही, तर रोहित पवार यांच्या जीवित सुरक्षेची आहे. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित निर्णय घ्यावा.” सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर यापूर्वी रोहित पवार यांनी VSR कंपनीच्या अनियमितता, अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्सच्या स्थितीवर संशय, आयटी सेलकडून होणारे ट्रोलिंग आणि इतर अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. मात्र आता रोहित पवार यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने संपूर्ण प्रकरणातील तणाव अधिकच वाढला आहे.