Rohit Pawar : दोन कोटींहून अधिक एसआयआर अर्ज अनुपलब्ध; रोहित पवारांचा आक्षेप
निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मतदार यादीतून दोन कोटींहून अधिक नावे वगळण्यावर आक्षेप घेतला. राज्यात एसआयआरच्या नोंदणी टप्प्याला ३० जून रोजी सुरुवात झाली.

Rohit Pawar : महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार पडताळणी (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान दोन कोटींहून अधिक मतदार नोंदणी अर्ज अनुपलब्ध आहेत. कारण मतदार एकतर अनुपस्थित होते, त्यांचे निधन झाले होते किंवा त्यांनी स्थलांतर केले होते.
निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मतदार यादीतून दोन कोटींहून अधिक नावे वगळण्यावर आक्षेप घेतला. राज्यात एसआयआरच्या नोंदणी टप्प्याला ३० जून रोजी सुरुवात झाली.
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सोमवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात ९,७८,५४,०४९ मतदार आहेत. ७,६९,५२,२६२ मतदारांचे (७८.६४ टक्के) गणना अर्ज डिजिटल करण्यात आले आहेत, तर २,०७,९३,९१६ मतदारांचे (२१.२५ टक्के) अर्ज गोळा न करताच राहिले, कारण हे मतदार एकतर अनुपस्थित होते, मृत होते, स्थलांतरित झाले होते किंवा त्यांची नावे दुबार होती.
राज्यभरात १,००,२५३ बूथ-स्तरीय अधिकारी तैनात असून, एसआयआर डिजिटायझेशनचे काम ९९.८९ टक्के पूर्ण झाले आहे. महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांपैकी चौदा जिल्ह्यांनी एसआयआरचे १०० टक्के काम पूर्ण केले आहे, तर मुंबईच्या दोन जिल्ह्यांनी सुमारे ९९ टक्के काम पूर्ण केले आहे.
पत्रकारांशी बोलताना पवार यांनी मसुदा यादीतून नावे वगळण्यावर आक्षेप घेतला. ज्या मतदारांची माहिती अपूर्ण आहे किंवा ज्यांच्या नावांमध्ये बदल झाला आहे, अशा मतदारांच्या छाननीनंतर हा आकडा आणखी वाढू शकतो, असा दावा त्यांनी केला.
पवार म्हणाले, मला अशी माहिती मिळाली आहे की, वगळलेल्या नावांपैकी सुमारे ३४ लाख मतदार मृत दाखवण्यात आले आहेत, ७६ लाख घरांशी संपर्क होऊ शकला नाही आणि ७७ लाख मतदारांनी आपला पत्ता कायमचा बदलला आहे. सुमारे दोन लाख लोकांनी माहिती देण्यास नकार दिला आहे, असा दावा त्यांनी केला.
ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, ज्यात अनुपस्थित आढळलेल्यांचाही समावेश आहे, ते मतदार यादीत समावेश करण्यासाठी फॉर्म ६ सादर करू शकतात. पडताळणीनंतर वगळलेल्यांपैकी काही नावे पुन्हा समाविष्ट केली जाऊ शकतात, असे पवार यांनी सांगितले.
बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांवर पडताळणी पूर्ण करण्यासाठी दबाव आहे आणि काही ठिकाणी ते टेबल सर्वेक्षण करत आहेत, ज्यासाठी भाजप कार्यकर्ते माहिती पुरवत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. पुणे, नाशिक आणि ठाणे येथे अशी प्रकरणे उघडकीस आली आहेत, असा दावा त्यांनी केला.






