Road Accident: जीव वाचवणारी १०८ सेवा ठरतेय ‘जीवघेणी’? पुणे-बंगळुरु महामार्गावर आपत्कालीन सेवेचा बोजवारा
Road Accident: प्रशासनाने तातडीने दखल घेऊन तालुकानिहाय रुग्णवाहिकांचे ऑडिट करावे; नागरिकांची संतप्त मागणी.

Road Accident – पुणे-बंगळुरु महामार्गावर अपघात झाला, रुग्ण गंभीर आहे, तातडीने रुग्णवाहिकेची गरज आहे. अशा संकटाच्या वेळी मदतीचा एकमेव आधार असलेली 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आपत्कालीन सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 108 आपत्कालीन सेवा वेळेवर उपलब्ध न झाल्याने अनेकांना मृत्यूची प्रतिक्षा करावी लागत आहे.
आपत्कालीन क्रमांकावर फोन करूनही रुग्णवाहिका पोहोचण्यास विलंब होत असल्याने गंभीर रुग्ण आणि अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांची अक्षरशः ससेहोलपट होत आहे. अपघातानंतरची सुरुवातीची काही मिनिटे रुग्णाच्या उपचारासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. मात्र रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्यास जखमी व्यक्तीला खासगी वाहनाने किंवा अन्य पर्यायी साधनांनी रुग्णालयात नेण्याची वेळ येते.
ग्रामीण भागात तर ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. 108 क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी किती वेळ लागणार, जवळची रुग्णवाहिका कुठे आहे, पर्यायी व्यवस्था काय आहे, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी असलेली यंत्रणा अशीच विलंबित राहिली तर तिच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे.
विशेषतः सातारा-पुणे महामार्गासह ग्रामीण भागातील अपघातप्रवण ठिकाणी 108 रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम आणि तत्पर असणे गरजेचे आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचण्यासाठी आवश्यक नियोजन प्रशासनाने करणे अपेक्षित आहे. आपत्कालीन वैद्यकीय सेवेत वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे रुग्णवाहिका उशिरा पोहोचण्याच्या प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने चौकशी होणे आवश्यक आहे.
रुग्णवाहिका उपलब्ध नसणे, वाहन बिघाड, कर्मचारी कमतरता, चालकांची उपलब्धता किंवा एकाच वाहनावर वाढलेला ताण यापैकी नेमके कारण काय आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. आपत्कालीन परिस्थितीत 108 क्रमांकावर संपर्क साधूनही रुग्णवाहिका पोहोचण्यास मोठा विलंब होत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे 108 सेवा नेमकी कोणासाठी आणि किती तत्पर आहेे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 108 सेवेअंतर्गत कार्यरत रुग्णवाहिकांची संख्या, त्यांची उपलब्धता, चालक व वैद्यकीय कर्मचार्यांची नियुक्ती, वाहनांची स्थिती तसेच कॉल मिळाल्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ याची प्रशासनाने गांभीर्याने तपासणी करण्याची गरज आहे. सेवा उपलब्ध नसल्यास पर्यायी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याची यंत्रणाही प्रभावी असणे आवश्यक आहे.
तालुकानिहाय ऑडिट करा…
108 सेवेबाबत होत असलेल्या तक्रारींची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रुग्णवाहिकांची उपलब्धता, कॉलनंतरचा प्रतिसाद वेळ, घटनास्थळी पोहोचण्याचा कालावधी, वाहनांची स्थिती आणि मनुष्यबळ याचे तालुकानिहाय ऑडिट करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वेळेत पोहोचणारी जीवनदायी यंत्रणा बनवा…
आपत्कालीन सेवेत ‘उशीर’ म्हणजे केवळ गैरसोय नसून तो एखाद्या रुग्णासाठी जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे 108 सेवा कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष घटनास्थळी वेळेत पोहोचणारी जीवनदायी यंत्रणा बनवावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन दोष दूर करण्याची गरज आहे.





