Satara: आझाद मैदानावरील आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार; `शाळा वाचवा शिक्षण वाचवा’ मंचच्या साताऱ्यातील बैठकीस प्रतिसाद
Satara हे आंदोलन विद्यार्थी आणि शिक्षणकेंद्री असून पालक, विद्यार्थी आणि सामान्य माणूस या आंदोलनाचा मुख्य आधार असेल, असे संजय वेतुरेकर यांनी स्पष्ट केले.

Satara: ‘शाळा वाचवा शिक्षण वाचवा’ मंचच्या नेतृत्वाखाली दि. ५ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या बेमुदत आंदोलनात सातारा जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार येथील बैठकीत घेण्यात आला.
मंंचच्यावतीने येथे आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी मिनाज सय्यद होते. राज्याचे निमंत्रक कॉ. संपत देसाई, ॲड. मिलिंद पवार, संजय वेतुरेकर, डॉ. प्रशांत पन्हाळकर आदी उपस्थित होते. ॲड मिलिंद पवार यांनी बैठकीमागील भूमिका स्पष्ट केली. हे आंदोलन राज्यव्यापी असून यात आपण सातारकर म्हणून भागीदारी करुन शाळा वाचवल्या पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. संपत देसाई म्हणाले, ‘नवीन शैक्षणिक धोरणाआडून सरकार दलित, बहुजन, कष्टकरी, आदिवासी, भटके विमुक्त, मुस्लिम अल्पसंख्यांक समूहातील मुलामुलींचे शिक्षणच बंद करु पाहत आहे. शिक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा हा प्रयत्न असून मंचच्यावतीने होणारे आंदोलन शिक्षणाचा हक्क कायम राखणारे आहे. राज्याच्या पातळीवर होणता असतानाच त्याचवेळी जिल्हा आणि विभागीय पातळीवरही आंदोलन होईल. यशस्वी झाल्याशिवाय आंदोलन थांबवले जाणार नाही.’’
हे आंदोलन विद्यार्थी आणि शिक्षणकेंद्री असून पालक, विद्यार्थी आणि सामान्य माणूस या आंदोलनाचा मुख्य आधार असेल, असे संजय वेतुरेकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील नियोजनावर भर देत मिनाज सय्यद यांनी जिल्हा आणि राज्याचा समन्वय करणारी समिती गठीत करून जबाबदाऱ्या निश्चित करण्याचे आवाहन केले. भूमिकेवर चर्चा न करता हे आंदोलन यशस्वी कसे करायचे याचे नियोजन करण्याचे आवाहन डॉ. प्रशांत पन्हाळकर यांनी केले. यावेळी चैतन्य दळवी, सागर कांबळे, जयंत उथळे, राजेंद्र गलांडे, भास्कर कदम, किरण यादव, प्रकाश खटावकर यांनीही काही सूचना मांडल्या. यावेळी उदय शिंदे, चंद्रकांत यादव, प्रथमेश सावंत व परिवर्तन चळवळीसह शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.





