PUNE: रा. स्व. संघपरिवाराची समन्वय बैठक आजपासून; देशभरातून 36 संघटनांचे 266 प्रतिनिधी राहणार उपस्थित

पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघपरिवारातील 36 संघटनांची तीन दिवसीय समन्वय बैठक गुरुवारी सर परशुराम महाविद्यालय सुरू होत आहे. या बैठकीला 266 प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, ते आपापल्या संघटनेतील कामकाजाचा आढावा सादर करतील. अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बुधवारी दिली.
संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पश्चिम महाराष्ट्राचे सहप्रांत प्रचारक अतुल अग्निहोत्री उपस्थित होते. ही बैठक गुरुवारी सकाळी नऊ वाजता सुरू होईल. दररोज पाच सत्र होतील. यात सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्यासह संघाचे डॉ. कृष्ण गोपाल, डॉ. मनमोहन वैद्य, मुकुंद सीआर, अरूण कुमार आणि रामदत्त चक्रधर हे सह सरकार्यवाह, परिवारातील संस्थांचे अलोक कुमार, मिलिंद परांडे, आशिष चौहान, याज्ञवल्क्य शुक्ल आदींसह प्रमुख पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
तसेच विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पक्ष, वनवासी कल्याण आश्रम, राष्ट्र सेविका समिती, संस्कार भारती, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, सक्षम, विद्या भारती यासह संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, महामंत्री (सरचिटणीस) असे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहतील, असे आंबेकर यांनी सांगितले. या बैठकीत पुढील वर्षभरात करावयाच्या कामकाजाची ढोबळ रूपरेषा निश्चित केली जाईल.
तसेच देशासमोरील विविध वैचारिक मुद्दे, धर्म, संस्कृती, विचारधारा, महिला सबलीकरण, सामाजिक परिवर्तन, पर्यावरण, कुटुंबव्यवस्था आदी विषयांवर चर्चा होईल. तसेच संघटनांचा आढावा घेतल्यानंतर सरसंघचालकांचे मार्गदर्शनही होणार आहे, असे आंबेकर म्हणाले. संघ परिवारातील संघटना विविध क्षेत्रात कार्यरत असून राष्ट्रसेवा करत आहेत. त्यात त्यांना आलेले अनुभव, अडचणी, समस्या याची मांडणी केली जाईल. यानंतर सरसंघचालक मार्गदर्शन करतील.
मात्र, या बैठकीत कोणताही निर्णय होणार नाही. सर्व संस्था आपपल्या कार्यकारिणी बैठकीत योग्य ते निर्णय घेतील, असे आंबेकर म्हणाले. महिला सबलीकरण, सामाजिक जीवनातील सहभाग वाढविणे, वैचारिक विषयांवर वाटचाल कशी असेल यावर चर्चा, सामाजिक परिवर्तन, जीवनमूल्य, पर्यावरण, समरसता, स्वदेशी आणि आर्थिक नीती यावर या वेळी चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.





