Rahul Gandhi : ‘मतदारसंघ फेररचना विधेयक फेटाळून लावा’; राहुल गांधींचे राजकीय पक्षांना आवाहन
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदारसंघ फेररचना विधेयकाला असणारा विरोध आणखी तीव्र केला. ते विधेयक संसदेत फेटाळून लावा...

Rahul Gandhi – कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदारसंघ फेररचना विधेयकाला असणारा विरोध आणखी तीव्र केला. ते विधेयक संसदेत फेटाळून लावा, असे आवाहन त्यांनी राजकीय पक्षांना उद्देशून केले.
राहुल यांनी शनिवारी तमिळनाडूचा दौरा केला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मतदारसंघ फेररचनेच्या मुद्द्यावरील भूमिका स्पष्ट केली. त्या फेररचनेचा उद्देश तमिळी जनतेचा मताधिकार हिरावणे, त्यांची राजकीय ताकद कमी करणे हा आहे. भाजपचे ते कारस्थान आहे.
त्यामुळे फेररचनेशी संबंधित विधेयकाला पाठिंबा देणारा तमिळनाडूचा आणि राज्याच्या भविष्याचा विश्वासघात करणारा ठरेल, असा इशारा त्यांनी दिला. केंद्र सरकारकडून संसदेत पुन्हा फेररचना विधेयक मांडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मतदारसंघ फेररचनेला तमिळनाडूु आणि दक्षिण भारतातील इतर राज्यांमधून आधीपासूनच विरोध होत आहे. फेररचनेच्या माध्यमातून लोकसभेतील जागा वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
मात्र, त्या प्रक्रियेमुळे कमी लोकसंख्या असल्याने दक्षिणेतील जागांचे प्रमाण कमी राहील. त्याउलट, जास्त लोकसंख्येमुळे उत्तरेतील जागांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढेल.
त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर दक्षिणेतील राज्यांचा राजकीय प्रभाव कमी होईल, अशी धास्ती व्यक्त केली जात आहे. राहुल यांनी संबंधित मुद्दा लावून धरण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे देशातील राजकारण पुन्हा ढवळून निघण्याची शक्यता बळावली आहे.





