बीड – विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतोय. सरकार पडणार आणि सरकार खंबीर असणं आमचं ध्येय नाही. तर जनतेसाठी काय करताय ते सांगा, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला. भगवानाबाबा भक्तीगड येथे आयोजित दसऱा मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या.
विरोधी पक्षातील नेता उठतो आणि हे सरकार पडणार आहे असं सांगतो. तर सत्ताधारी नेते म्हणतात आमचं सरकार खंबीर आहे. पण तुम्ही सरकार पडणार आणि नाही पडणार यातून बाहेर पडणार आहात की नाही ? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतोय. सरकार पडणार आणि सरकार खंबीर असणं आमचं ध्येय नाही. तर जनतेसाठी काय करतात ते सांगा यावर बोला, असं पंकजा म्हणाल्या.
राजकारणातील गुन्हेगारीकरण संपुष्टात आणताना विरोधी पक्षनेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात रान उठवलं होतं. तेव्हा सत्तापरिवर्तन झालं होतं. त्यामुळे विरोधी पक्षाने आणि सत्ताधारी आपापल्या भूमिकेकडे आणि जनतेच्या भल्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.
यावेळी त्यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनाही खोचक टोला लगावला. आपण नेत्यांची चमचेगिरी करम्यासाठी नव्हे तर भगवान बाबा आणि दसऱा मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्यांच्या चरणांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केल्याच पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील परळी येथे आले होते. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी जयंत पाटील यांचं भव्य स्वागत केलं होतं. तसेच क्रेनच्या सहाय्याने जयंत पाटील यांच्यासाठी भलामोठा फुलांचा हार बनवला होता. हाच धागा पकडून पंकजा यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी हेलिकॉप्टरमधून भगवानबाबांच्या आणि तुमच्या चरणी फुल टाकत होते. कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी फुल टाकत नव्हते. भगवनाबाबांविषयी असली श्रद्धा आणि तुम्ही इथे आलात या भावनेला आदरांजली वाहण्यासाठी मी फुल टाकल्याचं पंकजा यांनी म्हटलं. यावेळी पंकजा यांनी आपल्या आगामी काळातील दौऱ्याविषयी माहिती दिली.