पुणे – दुष्काळामुळे कमी झालेले उत्पन्न… चीन, बांग्लादेशमध्ये होणारी मोठी निर्यात… स्थानिक बाजारपेठांमधून वाढलेल्या मागणीमुळे लाल मिरची कडाडली आहे. मागील 10 ते 15 दिवसांत मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मिरचीच्या भावात सुमारे 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती दि पुना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष आणि मिरचीचे व्यापारी राजेंद्र गुगळे यांनी दिली.
मागील वर्षी मिरचीची लागवड नेहमीप्रमाणे झाली होती. मात्र, दुष्काळाचा फटका बसल्याने उत्पादन नेहमीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी कमी झाले. परिणामी, कोल्ड स्टोअरेजलाही यावर्षी सुमारे 10 ते 15 लाख पोती कमी माल ठेवण्यात आला. यावर्षी चीन, बांग्लादेश येथून मिरचीला मोठी मागणी आहे. चांगल्या दर्जाच्या तेजा, गंटुर मालाला चांगली मागणी आहे.
परिणामी सर्व प्रकारच्या मिरचीच्या भावात वाढ झाल्याचे गुगळे यांनी सांगितले. तर व्यापारी सोपान राख म्हणाले, जानेवारी ते मे असा मिरचांचा हंगाम असतो. सध्या साठवणीतील माल बाजारात येत आहे. तुरळक प्रमाणात म्हणजे महिन्याला 5 ते 10 गाड्यांची आवक होत आहे. गणपती झाल्यानंतर घरगुती आणि मसालेवाल्यांकडून मिरचीला मागणी वाढले. त्यावेळी भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच बॅडगी आणि खुडवा मिरचीचे भावही तेजीत आहेत. 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.