Private Bus Rash Driving: खासगी बसेसचा महामार्गावर थरार! वेळेत पोहोचण्याच्या शर्यतीत प्रवाशांचा जीव धोक्यात
Private Bus Rash Driving: काही जिल्ह्यांतील कठोर नियम आणि दंडाच्या कारवाईमुळे चालकांवर वेळेत पोहोचण्याचा प्रचंड दबाव; महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन.

Private Bus Rash Driving – पिंपरी-चिंचवडमधून बाहेर पडणाऱ्या काही खासगी बसेस वेळेत गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी महामार्गावर सुसाट धावत असल्याचे दिसून येत आहे. शहरातून सुटताना प्रवासी भरण्यासाठी आणि विविध थांब्यांवर थांबण्यात वेळ जातो. तसेच अनेकवेळा वाहतूककोंडीमुळे वेळ होतो. त्यामुळे पुढील प्रवासात तो वेळ भरून काढण्याची घाई केली जाते. याच घाईत वाहनांचा वेग वाढतो. परिणामी बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये खासगी बस वाहतुकीसाठी वेळेचे काटेकोर नियम असल्याचे सांगितले जाते. उशीर झाल्यास चालकांवर ५०० रुपये दंडाची कारवाई केली जाते. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये अशा प्रकारचा दंडात्मक नियम नाही. शहरातील कोणत्याही संघटनेकडून उशिरा पोहोचणाऱ्या बसवर कारवाई करण्याची पद्धत सुरू असल्याचेही दिसत नाही. मात्र, पुढील फेरीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते.
काही जिल्ह्यांमधील संघटना तसेच खासगी बस कंपन्यांनी अशा प्रकराची दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे शहरातून या जिल्ह्यांकडे जाणाऱ्या बसेसना तेथील वेळेचे गणित पाळावे लागते. त्यामुळे चालकांवर वेळेत पोहोचण्याचा दबाव निर्माण होतो. शहरातून निघाल्यानंतर महामार्गावर वेग वाढवून हा वेळ भरून काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र आहे. मात्र, यामुळे सरक्षिततेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
महामार्गावर पोहचताच अनेक वाहनचालक बेदरकारपणे वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या खासगी वाहनांमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. आता गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी या सणांच्या काळात मोठ्या प्रमाणावर खासगी बसने नागरिक आपआपल्या गावी जात असतात. त्यापूर्वी हा नियम बंद करत प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे अशी मागणी प्रवाशी करत आहेत.
शहरातील थांबे वाढतात, वेळ कमी पडतो
निगडी, चिंचवड, वल्लभनगर आणि नाशिक फाटा परिसरातून मोठ्या संख्येने खासगी बसेस सुटतात. प्रवासी घेण्यासाठी बस अनेक ठिकाणी थांबते. काही वेळा प्रवासी येण्याची प्रतीक्षा केली जाते. सामान चढविण्यासाठीही वेळ जातो. शहरातील वाहतूक कोंडीमुळे आणखी विलंब होतो. हा वेळ भरून काढण्यासाठी काही चालक महामार्गावर वाहनाचा वेग वाढवतात. त्यामुळे सुरक्षित अंतर राखणे आणि वेगमर्यादेचे पालन करणे धोक्यात येते.






