Ananya Birla rubbished the rumours of RCB name change : आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी क्रिकेट विश्वात सर्वात मोठी खळबळ उडाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) या संघाची मालकी बदलल्यानंतर आता चाहत्यांच्या मनात एकाच प्रश्नाने घर केले होते – ‘संघाचे नाव बदलणार का?’. अखेर या चर्चेवर अधिकृत पडदा पडला आहे. आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीपूर्वी आरसीबीच्या मालकी हक्कांचा ऐतिहासिक व्यवहार पूर्ण झाला आहे. तब्बल १६,७०६ कोटी रुपयांना हा संघ विकला गेला असून, आता आदित्य बिर्ला समूह, टाइम्स ऑफ इंडिया समूह, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन बीएक्सपीई या दिग्गज कंपन्यांची यावर संयुक्त मालकी असेल. आर्यमन बिर्ला हे या फ्रँचायझीचे नवे चेअरमन म्हणून पदभार सांभाळणार आहेत. नाव बदलण्याच्या चर्चेला पूर्णविराम – अनाया बिर्लाची इन्स्टा स्टोरी (RCB Name Change) संघाचा मालक बदलल्यानंतर सोशल मीडियावर ‘आरसीबी’चे नाव बदलले जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आर्यमन बिर्ला यांची बहीण अनन्या बिर्ला यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाचे नाव बदलले जाणार नाही. चाहत्यांची अस्मिता असलेल्या या नावासह संघ मैदानात उतरणार आहे. १८ वर्षांची प्रतीक्षा संपली! आरसीबी संघ २००८ पासून या स्पर्धेचा भाग आहे. दिग्गज फलंदाज विराट कोहली पहिल्या हंगामापासून या संघाचा कणा राहिला आहे. विराटने संघाला चॅम्पियन बनवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु यश हुलकावणी देत होते. अखेर, आयपीएल २०२५ मध्ये रजत पाटीदार याच्या नेतृत्वाखाली खेळताना आरसीबीने ऐतिहासिक कामगिरी केली आणि १८ वर्षांनंतर पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी उंचावली. हेही वाचा – Rinku Singh : आयपीएल २०२५ पूर्वी रिंकू सिंगला मिळाल्या दोन गुड न्यूज! KKR संघात आणि यूपी सरकारमध्ये मिळाली मोठी जबाबदारी पुन्हा एकदा जेतेपदाचा निर्धार – अनन्या बिर्ला यांनी आपल्या पोस्टद्वारे आरसीबीच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. नव्या मालकी हक्कांसह आणि नव्या उर्जेने संघ पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता नव्या व्यवस्थापनाखाली आरसीबी २०२६ मध्ये आपले जेतेपद टिकवून ठेवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.