“आमची वकिली कुणीही करायची गरज नाही”अजित पवारांच्या या वाक्याला राऊतांचे उत्तर; म्हणाले,”मी कुणाच्या बापाला घाबरत नाही”

मुंबई : राज्यात काल दिवसभर विरोधीपक्ष नेते अजित पवार पुन्हा एकदा बंड करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र खुद्द अजित पवारांनी या बातम्यात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत हे सर्व दावे फेटाळून लावले. दरम्यान, यावेळी त्यांनी आमची वकिली कुणीही करायची गरज नाही. जे काही आमच्या पक्षाबाबत सांगायचं आहे ते आम्ही सांगू इतरांनी त्यात पडू नये असे म्हणत पवारांनी संजय राऊत यांचेनाव न घेता सुनावले होते. दरम्यान, त्यांच्या याच वाक्यावर आता संजय राऊत यांनी मी कुणाच्या बापाला घाबरत नाही असे म्हणत अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी,“महाविकास आघाडी ही तीन पक्षांची आहे. महाविकास आघाडीचे आम्ही चौकीदार आहोत असं मी नेहमी म्हणतो. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना हे पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून फोडण्याचा प्रयत्न होतो तेव्हा आम्ही एकत्र असतो. शिवसेना फुटत असताना शरद पवार किंवा अजित पवार, नाना पटोले यांनी चिंता व्यक्त केलीच होती. तशीच आम्ही चिंता व्यक्त केली ” असे म्हणत संजय राऊत यांनी अजित पवारांना उत्तर दिले.
पुढे बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडीची वकिली केली म्हणून माझ्यावर खापर का फोडलं जातंय? मी महाविकास आघाडीबाबत काय चुकीचं बोललो? शिवसेना फुटत होती तेव्हा तुम्ही आमची वकिली करत होतात. आपल्या बरोबरचा घटकपक्ष मजबूत रहावा त्याचे लचके तोडले जाऊ नयेत ही आमची भूमिका असेल आणि कुणी याबाबत आमच्यावर खापर फोडत असेल तर जरा गंमत आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
रविवारी मी जे रोखठोक लिहिलं त्यामुळेच भाजपाचं ऑपरेशन लोटस बॅकफूटवर गेलं. बंगाल, महाराष्ट्र आणि बिहार या ठिकाणी हेच चाललं आहे. आम्ही सगळे या षडयंत्राला लढण्यासाठी तयार आहोत. मी जर खरं बोललो आहे म्हणून मला कुणी टार्गेट करत असेल तरीही मी खरं बोलत राहणार. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. मला जे बोलायचं आहे ते बोलत राहणार. असे म्हणत पवारांवर संजय राऊतांनी निशाणा साधला.
हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, प्रफुल पटेल यांना विचारा जाऊन की तुमच्यावर पक्ष सोडण्यासाठी दबाव आहे की नाही? अजून किती नावं देऊ तुम्हाला? आमच्यासारखे लोक जर याबाबत प्रश्न विचारत आहेत. तर भाजपाला राग आला पाहिजे इतर कुणाला नाही. माझ्या भूमिकेवर अजित पवार कसे प्रश्न उपस्थित करतात? शरद पवारांनी मला विचारलं काही सल्ला दिला तर मी तो मान्य करेन. ऑपरेशन लोटसबाबत मी लिहिलं तर चुकीचं काय? विरोधी पक्षांना तोडण्याचा प्रयत्न होतोय की नाही याचं उत्तर अजित पवारांनी द्यावं असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.





