Ranveer Singh And Mohan Bhagwat: अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या ‘धुरंधर 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. याचदरम्यान त्याचा नागपूर दौरा अचानक समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावेळी त्याने थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. रणवीर सिंगचा हा दौरा अतिशय गुप्त ठेवण्यात आला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, संघ मुख्यालयात रणवीर सिंग आणि मोहन भागवत यांच्यात अनौपचारिक चर्चा झाली. या चर्चेत नेमकं कोणत्या विषयावर चर्चा केली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, या भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. रणवीरचा नागपूर दौरा (Ranveer Singh And Mohan Bhagwat) रणवीर सिंगचे दुपारी 4 वाजता रणवीर सिंगचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्याच्यासोबत आणखी चार जण होते. तेथून रणवीरसह त्याच्या सहकाऱ्यांनी थेट महालातील संघ मुख्यालय गाठले. तेथे त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान रणवीरने त्याच्या चित्रपटाबाबत माहिती दिली. तसेच संघाची प्रणाली व विविध सेवाकार्यांबाबत जाणून घेतले. Ranveer singh जवळपास दीड तास तो संघ मुख्यालयात होता. त्यानंतर तो रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात गेला. तेथे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी रणवीर सिंगनं संघाच्या काही पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधला. तसेच बाल स्वयंसेवकांशीही त्यानं संवाद साधला. त्यानंतर तो रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास मुंबईकडे निघाला. भेटीबाबत अनेक तर्क-वितर्क दरम्यान, काहीजण या भेटीला केवळ शिष्टाचार म्हणून पाहत आहेत, तर काहीजण त्यामागे वेगळे अर्थ शोधत आहेत. याशिवाय काहीजण ‘धुरंधर’ चित्रपटाला ‘प्रोपगंडा फिल्म’ म्हणत आहेत, तर समर्थक मात्र चित्रपटाचं कौतुक करत आहेत. अशा परिस्थितीत रणवीर सिंगचा नागपूर दौरा आणि संघ प्रमुखांशी झालेली भेट याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, याआधी फेब्रुवारीमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान यानेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी देखील यावर मोठी चर्चा रंगली होती. हेही वाचा: Ashok Kharat Case : राजकीय वर्तुळात खळबळ! सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका?