Randeep Surjewala : रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी केल्याने भारताला मोठी बचत झाली होती. मात्र अमेरिकेच्या दबावाखाली ही खरेदी थांबवली तर इंधनदर वाढण्याची शक्यता आहे. हे मजबूत सरकार आहे की मजबूर सरकार? आत्मनिर्भर भारत की अमेरिका-निर्भर भारत? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला (Randeep Surjewala) यांनी कराराच्या अटी सार्वजनिक करण्याची मागणी करताना केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की, व्यापार करार हा समान अटींवर आणि परस्पर सार्वजनिक हिताच्या आधारावर असला पाहिजे. देशाच्या सार्वभौमत्वाचे बलिदान देऊन व्यापार करार गुलामगिरीचा मार्ग ठरू नये. राष्ट्रीय हिताशी तडजोड मान्य नाही. भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करारावरून राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर शरणागती पत्करल्याचा गंभीर आरोप केला आहे. Randeep Surjewala या करारामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे जीवनमान उद्ध्वस्त होईल, असा दावा यावेळी सूरजेवाला यांनी केला. ते म्हणाले की, कराराच्या प्राथमिक अटींनुसार भारत अमेरिकन कृषी व अन्न उत्पादनांसाठी आपली बाजारपेठ आयात शुल्काशिवाय खुली करणार आहे. प्रक्रिया केलेले मका, ज्वारी, सोयाबीन, फळे भारतात मोठ्या प्रमाणावर आली, तर स्थानिक शेतकरी स्पर्धेत टिकणार कसे? असा सवाल त्यांनी केला. तसेच, जीएम पिकांना मागच्या दाराने मान्यता देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला. काँग्रेसनेते जयराम रमेश यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत म्हटले की, पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्यासमोर पूर्ण शरणागती पत्करली आहे. त्यांच्या मते, हा करार राज्यांतील लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम करेल.