Ramgiri Maharaj : ‘जन गण मन’ हे देशाचे राष्ट्रगीत असू शकत नाही, रामगिरी महाराजांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Ramgiri Maharaj Statement : सरला गोवर्धनचे मठाधिपती रामगिरी महाराज त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. ‘जन गण मन’ला राष्ट्रगीत मानणं योग्य नाही, त्याऐवजी वंदे मातरम हेच राष्ट्रगीत असावे, असे वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
मिशन अयोध्या चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तेथे राष्ट्रगीत लावण्यात आले होते. त्यानंतर बोलताना रामगिरी महाराज यांनी ‘जन गण मन’ला राष्ट्रगीत मानणे योग्य नाही, असे वक्तव्य केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, रविंद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत 1911 मध्ये जॉर्ज पंचम यांना खूश करण्यासाठी गायले होते. जॉर्ज पंचमने हिंदुस्थानवर खूप अत्याचार केले आणि त्यावेळी त्याच्या समर्थनात, त्यांची स्तुती करताना हे गीत गायलं गेलं, त्यामुळे हे गीत राष्ट्राला समर्पित नाही. त्यामुळे वंदे मातरम हेच खऱ्या अर्थानं राष्ट्रगीत आहे.
तसेच, रविंद्रनाथ टागोरांनी ब्रिटिशांची स्तुती केली, त्यामुळेच त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. , पूर्वी साधू-संतांना चित्रपटांमध्ये महत्त्व दिले जात नव्हते, परंतु आज साधू-संतांना चित्रपटांमध्ये महत्त्व दिले जात आहे, असे मत त्यांनी यावेळी वक्तव्य केले.
दरम्यान, रामगिरी महाराज हे त्यांच्या वक्तव्यांमुळे याआधीही वादात अडकले आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले होते. रामगिरी महाराज हे सरला गोवर्धनचे मठाधिपती आहेत. त्यांचे मूळ नाव सुरेश रामकृष्ण राणे असे आहे. लहानपणीच त्यांनी अध्यात्मिक मार्ग निवडला होता. 2009 मध्ये त्यांनी दीक्षा घेतली आणि गंगागीर महाराजांचे शिष्य नारायणगिरी महाराज यांचे शिष्य बनले. 2009 मध्ये नारायणगिरी महाराजांच्या मृत्यूनंतर, रामगिरी महाराज सरला बेटाच्या गादीचे वारस बनले.





