Raksha Bandhan: भावासाठी ‘पुष्पा’ राखी तर मुलांसाठी ‘पब्जी’! कामशेतची बाजारपेठ रंगीबेरंगी राख्यांनी सजली
Raksha Bandhan: रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर कामशेत बाजारपेठेत लगबग; पारंपरिक लुंबा राख्यांसह बच्चेकंपनीसाठी पब्जी, कार्टून आणि खेळण्यांच्या राख्या ठरताहेत प्रमुख आकर्षण.

Raksha Bandhan – बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कामशेत परिसरातील बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. रंगीबेरंगी राख्या, गोंड्यांच्या राख्या, कार्टून राख्या, घड्याळाच्या राख्या तसेच लहान मुलांसाठी खेळण्यांसह असलेल्या राख्यांनी दुकाने सजली आहेत. यंदा दाक्षिणात्य चित्रपट पुष्पाच्या लोकप्रियतेची झलक राख्यांमध्येही पाहायला मिळत असून, पुष्पा राखी बच्चे कंपनीचे विशेष आकर्षण ठरत आहे.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणींकडून भावासाठी राखी खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. बाजारपेठेत राख्या खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी वाढत आहे. काही बहिणी आपल्या भावांना पोस्टाने राखी पाठवतात. त्यामुळे रक्षाबंधनाच्या काही दिवस आधीच राखी खरेदी करण्यास सुरुवात केली जाते. नोकरी, शिक्षण किंवा अन्य कारणांमुळे अनेक भाऊ-बहीण वेगवेगळ्या शहरांत राहतात.
त्यामुळे काही बहिणी पोस्ट किंवा कुरिअरने राख्या भावांकडे पाठवतात. अशा बहिणी साधारणपणे १५ दिवस ते महिनाभर आधीच राख्यांची खरेदी करतात. दुकानदारांनीही ग्राहकांची आवड लक्षात घेऊन विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध करून दिल्या आहेत. पारंपरिक राख्यांबरोबरच आधुनिक डिझाइनच्या राख्यांना तरुणींमध्ये मागणी असल्याचे दिसून येत आहे. लहान मुलांसाठी बाजारात विशेष प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत.
राखीसोबत एखादे छोटे खेळणे किंवा आकर्षक वस्तू असल्यास मुलांना त्या राख्यांची विशेष पसंती मिळते. त्यामुळे यंदा पब्जी, कार्टून, घड्याळ, कॅरम तसेच विविध चित्रांच्या राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत. कामशेत बाजारपेठेत सर्वसामान्यांच्या बजेटला परवडतील अशा राख्यांपासून महागड्या आणि आकर्षक राख्यांपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत.
किमान पाच रुपयांपासून राख्या विक्रीसाठी उपलब्ध असून, डिझाइन आणि साहित्याप्रमाणे त्यांच्या किमती वाढत जातात. यामुळे प्रत्येक ग्राहकाला आपल्या बजेटनुसार राखी खरेदी करता येत आहे. सण जवळ येत असल्याने पुढील काही दिवसांत राख्यांच्या खरेदीला आणखी वेग येण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.





