शिरोळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा घटक पक्षांचा आग्रह
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह आघाडीतील घटक पक्षांकडून त्यांना आग्रह होत आहे.
राजू शेट्टी देखील निवडणूक लढवण्यास तयार आहेत. नुकतेच त्यांनी चंद्रकांत पाटील निवडणूक लढवणार असतील तर मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली नाही तरीही शिरोळमधून निवडणूक लढवण्याचा शेट्टी यांचा विचार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आघाडीच्या घटक पक्षांची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत घटक पक्षांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडे 55 ते 60 जागांची मागणी केली आहे. मात्र कॉंग्रेस, राष्ट्रवादीने घटक पक्षांसाठी 38 जागा सोडल्या आहेत. मात्र कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव घटक पक्षांना मान्य नाही. राजू शेट्टी हेच घटक पक्षांचे नेतृत्व करणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.
शेट्टी म्हणाले होते की, आगामी विधानसभा निवडणूक स्वाभिमानी पक्ष लढवणार आहे. भाजप आणि शिवसेना मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी निर्माण करावी अशीच भूमिका स्वाभिमानी संघटनेची आहे. या महाआघाडीमध्ये बहुजन वंचित आघाडीने सुद्धा यावे, असेही शेट्टी यावेळी म्हणाले होते.