मुंबई – कोहिनूर मिल प्रकरणी ईडीने कार्यालयात राज ठाकरे यांची आज साडेआठ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत उन्मेश जोशी, राजेंद्र शिरोडकर यांना जे प्रश्न विचारले गेले त्याच संदर्भातले प्रश्न ईडीने घेतल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांना पुन्हा चौकशीसाठी सामोरे जावे लागणार की नाही? हे स्पष्ट व्हायचे आहे. मात्र, उद्या राज ठाकरे यांना बोलवण्यात आलेले नाही, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात सकाळी साडेअकराच्या सुमारास दाखल झाले होते आणि रात्री सव्वाआठच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. त्यांची दुपारी 12 वाजेपासून चौकशी सुरु करण्यात आली होती. ती रात्री सव्वा आठच्या सुमारास पूर्ण झाली. यावेळी दिल्लीचे अधिकाऱ्यांनीही ईडी कार्यालयात येऊन राज यांची कसून चौकशी केली. कोहिनूर मिलच्या व्यवहाराशी संबंधित सर्व माहिती राज यांच्याकडून घेण्यात आली. साडेआठ तासाच्या प्रदीर्घ चौकशीनंतर गरज पडल्यास राज ठाकरेंना पुन्हा बोलवण्यात येईल, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी जी काही उत्तरे दिली आहेत ती समाधानकारक आहेत, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मीडियाशी कोणताही संवाद न साधता ते कृष्णकुंज या ठिकाणी म्हणजेच त्यांच्या निवासस्थानी ते रवाना झाले आहेत. शर्मिला ठाकरे, उर्वशी ठाकरे, अमित ठाकरे हे वेगळ्या गाडीतून कृष्णकुंज या ठिकाणी गेले.