- उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात 35 मृत्यू
- शेकडोजण पूरात अडकले
- जम्मू, हरियाणा आणि पंजाबमध्येही पूरस्थिती
नवी दिल्ली- उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर झाला असून या राज्यांमध्ये पावसाशी संबंधित वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पूरामुळे शेकडोजण काही ठिकाणी अडकून पड्ले आहेत. हरियाण, पंजाब आणि जम्मूमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीमध्ये यमुना नदी धोक्याच्या खुणेजवळ वाहत आहे.
हिमाचल प्रदेशात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. भूस्खलन आणि दरडी कोसळल्यामुळे पाणी आणि पुरवठा विस्कळीत झाला आहे. आज आणखी तिघांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यात मरण पावणाऱ्या पूरबळींची संख्या 25 झाली आहे. उद्यापर्यंत पावसाचे प्रमाण कमी ह्योण्याची चिन्हे नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
भूस्खलन आणि पूरामुळे ठिकठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. त्यामुळे किमान 500 ज्ण वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. राज्यात पावसामुळे आतापर्यंत 574 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे राज्य सरकारच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यातही पूरामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या वाढली आहे. वेगवेगळ्या गावात पूराच्या पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यामुळे पूरबळींची संख्या 10 झाली आहे. अजूनही 6 जण बेपत्ता आहेत. हिमाचलच्या सीमेलगतच्या डझनभर गावातील काही घरे आणि शेकडो हेक्टर शेतजमिनीचे पूरामुळे नुकसान झाले आहे.
यमुना नदीची पातळी धोक्याची खूण ओलांडण्याची लक्षणे आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी किंवा तात्पुरत्या आश्रय छावण्यांमध्ये स्थलांतर करण्याची सूचना केली आहे. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांबरोबर परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
पंजाब आणि हरियाणातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंजाबमध्ये आज शाळांना सुटी देण्यात आली होती. पूरात अडकलेल्या 9 जणांना वाचवण्यात आले आहे. हरियाणाने 8.28 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग यमुनानदीत सोडला आहे. तर जम्मूमध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने तवी नदीच्या पूरात अडकलेल्या चार मच्छिमारांना सोडवले.